लखनौ – उत्तरप्रदेशला सोमवारी पाऊस, वादळाचा तडाखा बसला. त्याशिवाय, विजा कोसळण्याच्याही घटना घडल्या. त्यामुळे त्या राज्यात एका दिवसात 39 जण मृत्युमुखी पडले. उत्तरप्रदेशात 12 जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. त्याशिवाय, पाऊस आणि वादळाच्या तडाख्यामुळे अनेक ठिकाणी वीजेचे खांब, झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या.
त्यामध्येही जीवितहानी झाली. अंगावर विजा कोसळून काही जण दगावले. काही पाळीव जनावरेही नैसर्गिक आपत्तीचे बळी ठरले. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जीवित आणि वित्तहानीचा आढावा घेतला. त्यांनी जीवितहानीबद्दल दु:ख व्यक्त केले. तसेच, मृतांच्या कुटूंबीयांना प्रत्येकी 4 लाख रूपयांची मदत जाहीर केली.