पुणे –अवघ्या पंधरा दिवसांपूर्वी सिंहगडावर सुरू करण्यात आलेली ई-बस सेवा शासकीय विभागांमधील समन्वय, ढिसाळ नियोजन आणि अनागोंदी निर्णयांमुळे अखेर स्थगित करण्याची वेळ पीएमपी प्रशासनावर ओढावली आहे.
महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत ही सेवा सुरू करण्यात आली होती. मात्र, दोन आठवड्यांत झालेले चार अपघात, बससाठी चार्जिंग स्टेशनची सोय नसणे, अव्वाच्या-सव्वा तिकीट आणि छोटा घाट रस्ता असताना या मार्गावर सोडलेल्या मोठ्या बसेस अशा कारणांमुळे या बससेवेला गेल्या पंधरा दिवसांत कौतुकापेक्षा टीकाच सहन करावी लागली होती. तर ही सेवा प्रायोगिक तत्त्वावर सुरू केल्याचे स्पष्टीकरणही हा निर्णय घेताना पीएमपीने दिले आहे. त्यामुळे गडावर जाण्यासाठी आता पर्यंटकांना पुन्हा खासगी वाहने वापरता येणार आहेत.
या करणार उपाययोजना या सेवेला तात्पुरती स्थगिती देण्यात आल्यानंतर पीएमपीकडून सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी स्वतंत्र नियोजन केले आहे. त्यात लहान बसेस आणणे, बसेसच्या संख्येच्या तुलनेत चार्जिंग स्टेशन वाढविणे, घाट रस्त्यावरील वळणे तसेच काही भागातील रस्त्याचे तातडीने रुंदीकरण करणे, प्रवाशांसाठी सुविधा उपलब्ध करणे अशी कामे केली जाणार आहेत. मात्र, त्यासाठी नेमका किती कालावधी लागणार आहे. हे निश्चित नसल्याने ही सेवा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे.
सिंहगड ई-बस सेवेतील समस्या जोपर्यंत सुटत नाहीत, तोपर्यंत ही सेवा बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत. नागरिकांच्या सुरक्षितेला प्राधान्य असून कोणाचाही जीव धोक्यात जाऊ नये, यासाठी हा निर्णय घेतला आहे. सिंहगडावर लहान ई-बस देता येणे शक्य आहे का, असे अधिकाऱ्यांना विचारले याच आकारामध्ये ई-बस येते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे घाट रस्त्याची दुरुस्ती करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
– अजित पवार,उपमुख्यमंत्री, ढिसाळ नियोजनामुळे ओढावली नामुष्की