सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर प्रशासनाच्या हालचाली वाढल्या
सातारा – ओबीसी आरक्षणाशिवाय राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम आठ दिवसांत जाहीर करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्याने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. जिल्हा प्रशासनाने कच्ची प्रभागरचना निवडणूक आयोगासमोर नुकतीच सादर केल्याने लवकरच निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे.
जिल्हा परिषद सदस्यांचा कार्यकाल 21 मार्चला व पंचायत समिती सदस्यांचा कार्यकाल 13 मार्चला संपल्यानंतर तेथे प्रशासकीय राजवट सुरू आहे. करोना, ओबीसी आरक्षणाचा तिढा आदी कारणांमुळे निवडणुकांना ब्रेक लागला होता. राज्य शासनानेही विधानसभेत निवडणूक आयोगाचे अधिकार मिळवून ओबीसी आरक्षणप्रश्नी कार्यवाही सुरू केली होती. त्यामुळे या निवडणुका सहा महिने तरी लागणार नाहीत, अशी शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त होत होती; परंतु रखडलेल्या निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयाने नुकताच निर्णय घेत आठ दिवसांत निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याचा आदेश दिला आहेत.
त्यानंतर प्रशासकीय व राजकीय चक्रे गतिमान झाली आहेत. एक महिन्यानंतर पावसाळा सुरू होणार असल्याने, आता निवडणुका जाहीर झाल्या, तरी त्या घेण्यासाठी पुरेशी यंत्रणा उपलब्ध होऊ शकणार नाही. सातारा जिल्हा परिषदेची सदस्य संख्या 64 वरून 74, तर पंचायत समित्यांची सदस्य संख्या 128 वरुन 148 करण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात गट-गणांची पुर्नरचना होणार आहे. जिल्ह्यात दहा गट वाढणार असून प्रशासनाने कच्ची प्रभागरचना करून निवडणूक आयोगासमोर सादर केली आहे. त्यास निवडणूक आयोगाने संमती दिल्यानंतर ही प्रभाग रचना नागरिकांच्या अवलोकनार्थ जाहीर होणार आहे.
या प्रभाग रचनेवरील हरकतींवर सुनावणी घेऊन पक्की प्रभागरचना जाहीर होणार आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष व पंचायत समिती सभापती आणि सदस्य आरक्षण सोडत बाकी आहे. या बाबींचा विचार करता सध्या तरी निवडणुका होतील, अशी चिन्हे नाहीत. निवडणूक आयोगाने तात्काळ निवडणूक जाहीर केली, तरी जावळी, महाबळेश्वर, वाई, पाटण, सातारा या तालुक्यांमध्ये अतिपर्जन्यमान असल्याने निवडणूक प्रक्रिया राबवताना अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे निवडणूक आयोग्य तात्काळ निवडणुका घेईल, अशी शक्यता तूर्त नाही. जिल्हा प्रशासनाने निवडणुकीच्या कामाला गती दिली आहे. तालुका स्तरावरून माहिती गोळा करण्यात येत आहे.
राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी
राज्यातील रखडलेल्या सर्व निवडणुका निवडणूक आयोग कोणत्याही क्षणी जाहीर करण्याची शक्यता असल्याने राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सातारा जिल्ह्यात चाचपणी सुरू केली आहे. पवारांच्या नुकत्याच झालेल्या दौऱ्यात व्यूहरचना आखण्यात आली आहे. विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर, पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांना याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी आतापासूनच झडू लागल्या आहेत.
इच्छुकांकडून लॉबिंग सुरू
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत इच्छुकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. इच्छुकांनी आतापासूनच लॉबिंग सुरू केले आहे. नेतेमंडळींच्या भेटींवर जोर दिला आहे. काहींनी तर आपल्यालाच उमेदवारी मिळणार असे गृहीत धरून कामाला सुरुवात केली आहे. जिल्हा परिषदेवर बराच काळ राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. पंचायत समित्यांमध्येही राष्ट्रवादी आघाडीवर आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार असल्याने जिल्हास्तरावरील निवडणुकांमध्येही आघाडीचा फॉर्मुला राबवणार का, याची उत्सुकता आहे.