सातारा -एका गुन्ह्यात मदत करून, त्यातून बाहेर काढण्यासाठी तक्रारदाराकडून 20 हजार रुपयांची लाच घेताना लोणंद पोलीस ठाण्यातील हवालदार भगवान किसन पवार याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी (दि. 9) रात्री उशिरा पकडले. या कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सातारा कार्यालयाकडून मिळालेली माहिती अशी, तक्रारदार व त्याचा भाऊ यांना लोणंद पोलीस ठाण्यातील दाखल गुन्ह्यातून बाहेर काढण्यासाठी हवालदार भगवान पवारने तक्रारदाराकडे वीस हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. याप्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सातारा कार्यालयाकडे तक्रार नोंदवली होती.
या तक्रारीची पडताळणी करून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने हवालदार भगवान पवार याला पकडण्यासाठी काल (दि. 9) रात्री उशिरा सापळा रचला. त्यावेळी तक्रारदाराकडून 20 हजार रुपयांच्या लाचेची रक्कम स्वीकारताना पवार याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. पवार याच्यावर लोणंद पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे सातारचे पोलीस उपअधीक्षक अशोक शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विक्रम पवार, सचिन राऊत, हवालदार संभाजी काटकर, नीलेश वायदंडे, नीलेश येवले यांनी ही कारवाई केली. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील हे सातारा जिल्हा दौऱ्यावर असताना, औंध पोलीस ठाण्याच्या कोठडीतून पाच दरोडेखोरांनी पलायन केले होते. या घटनेमुळे जिल्हा पोलीस दलाची अब्रू वेशीवर टांगली गेली असताना, त्या पाठोपाठ लाचखोरीचेही प्रकरण घडले. गृह राज्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात पोलिसांच्या लाचखोरीच्या घटना वाढत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.