नवी दिल्ली – देशद्रोह किंवा राजद्रोहाच्या संबंधीत कलम 124 अ विषयी केंद्र सरकारने उद्या बुधवार पर्यंत आपली भूमिका स्पष्ट करावी असा आदेश सुप्रीम कोर्टाने दिला आहे. या कलमाविषयी फेरविचार करण्याची तयारी केंद्र सरकारने दर्शवली आहे पण तोपर्यंत या विषयीच्या खटल्यांबाबत विचार करू नये असे केंद्र सरकारने अलिकडेच सुप्रीम कोर्टाला सांगितले होते.
आज झालेल्या सुनावणीच्यावेळी सरकारने केंद्राकडे या विषयी स्पष्ट उत्तर मागितले आहे. त्यांनी म्हटले आहे की, जो पर्यंत तुम्ही या कलमाबाबत विचार करीत राहणार आहात तो पर्यंत ज्यांच्यावर या कलमाअंतर्गत गुन्हे दाखल झाले आहेत त्यांचे काय होणार आहे? आणि या कलमांतर्गत नव्याने काही गुन्हे दाखल केले जाणार आहेत का? यावर केंद्राने भूमिका स्पष्ट करावी असे निर्देशही कोर्टाने दिले आहेत.
हा ब्रिटीश कालीन कायदा आहे आणि देशाच्या स्वातंत्र्याचा 75 वा वर्धापन दिन साजरा करीत असताना या कायद्याची गरजच नाही अशी भूमिका घेत अनेक याचिकाकर्त्यांनी हे कलमच रद्द करण्याची मागणी केली आहे. त्यावर कोर्टात सध्या सुनावणी सुरू आहे. उद्या बुधवारी सरकारला आपली भूमिका सादर करण्याचा आदेश कोर्टाने दिला असल्याने सरकार उद्या त्यावर आपली काय भूमिका घेणार या विषयी उत्त्सुकता निर्माण झाली आहे.