मुंबई – मुंबईत रेल्वेचे प्लॅटफॉर्म तिकीट महागले आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागीय मंडळाने प्लॅटफॉर्मचे तिकीट दर वाढवले आहेत. तिकीट दर 10 रुपयांवरून 50 रुपये करण्यात आला आहे. ही दरवाढ तात्पुरत्या स्वरूपाची असून रेल्वे स्थानकांवर गर्दी नियंत्रित करण्यासाठी आणि आलार्म चेन पुलिंगचा गैरवापर रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेच्या मुंबई विभागीय मंडळाचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुतार यांनी दिली आहे. 9 मे पासून ते 23 मे पर्यंत तात्पुरत्या स्वरूपात ही प्लॅटफॉर्म तिकिटाची दरवाढ असणार आहे.
सुतार यांनी जाहीर केलेल्या नोटीसमध्ये लिहीले आहे की, रेल्वे स्थानकांवर गर्दी नियंत्रित करण्यासाठी आणि अलार्म चेन पुलिंगचा गैरवापर रोखण्यासाठी मध्य रेल्वेने 9 मे पासून ते 23 मे पर्यंत तात्पुरत्या स्वरूपात प्लॅटफॉर्म तिकिटाचे दर वाढवले आहेत. त्यानुसार आता प्लॅटफॉर्म तिकीट 10 रुपयांवरून 50 रुपये केले आहेत. मुंबई आणि इतर काही रेल्वे प्लॅटफॉर्मवर प्लॅटफॉर्म तिकीट महागले आहे. ही दरवाढ 15 दिवसांपर्यंत असेल.
In order to control crowd and curb misuse of Alarm Chain pulling in summer season, it is proposed the price of platform tickets to be increased as a temporary measure frm Rs.10 to Rs. 50 at CSMT, Dadar, LTT, Thane, Kalyan & Panvel stations for 15 days from 9/5/2022 to 23/5/2022. pic.twitter.com/aKwookd41y
— Shivaji M Sutar (@ShivajiIRTS) May 8, 2022
मध्य रेल्वेने मुंबई आणि मुंबई उपनगरांतर्गत येणाऱ्या एकूण सहा रेल्वे स्थानकांवर रेल्वे प्लॅटफॉर्मचे तिकीट दरात वाढ केली आहे. यात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर स्टेशन, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे, कल्याण आणि पनवेल या सहा स्थानकांचा समावेश आहे.
प्लॅटफाॅर्मचे तिकीट दर वाढवण्याचे कारण सांगताना रेल्वे अधिकारी म्हणाले की, मागील महिन्यात अलार्म चेन पुलिंगच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. पुरेशा किंवा वैध कारणाशिवाय अलार्म चेन खेचल्याबद्दल रेल्वे कायद्याच्या तरतुदींनुसार तब्बल 188 गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली असून तब्बल 94000 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच मध्य रेल्वेने प्रवाशांना आवाहन केले आहे की त्यांनी अनावश्यक आणि शुल्लक कारणांसाठी अलार्म चेन पुलिंगचा वापर करू नये कारण यामुळे इतर प्रवाशांची गैरसोय होत आहे. दरम्यान, गेल्या महिन्यात मुंबई विभागात अलार्म चेन पुलिंगच्या एकूण 332 प्रकरणांची नोंद झाली आहे. यापैकी 53 प्रकरणे वैध कारणांवर आधारित नोंदवण्यात आली होती, तर 279 प्रकरणांमध्ये वैध कारणे नाहीत.