नांदेड – जिल्ह्यातील सावरगाव येथील एका नववधुने लग्नानंतर अवघ्या चार दिवसात प्रियकरासोबत पलायन केल्याची माहिती समोर आली आहे. सासरहून माहेरी मांडव परतणीसाठी आल्यानंतर नवरीने प्रियकरासोबत धूम ठोकली. या घटनेने नवरदेवासह दोन्ही कुटुंबातील व्यक्तींना मोठा धक्का बसला आहे. या प्रकरणाची मनाठा पोलीस स्टेशनमध्ये नोंद झाली आहे. विशेष म्हणजे या प्रियकराचेही लग्न 20मे ला करण्याचे ठरले होते. या प्रेमी युगलाच्या धाडसामुळे चार कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत.
सावरगाव येथील एका युवतीचे भावकितीलच एका युवकासोबत प्रेमसंबंध होते. भावकीतील असल्याने घरच्यांनी लग्नाला विरोध दर्शिवला. युवतीचे लग्न तिच्या इच्छेविरूद्ध भोकर तालुक्यातील युवकाशी रीतीरिवाजाप्रमाणे 21 एप्रिल रोजी झाले होते. प्रियकराचे लग्न 20 मेला करण्याचे ठरले होते. पण अंधळ्या प्रेमामुळे दोघांनी सर्व समाज रितीरिवाजाला झुगारून पळ काढला.
नववधू लग्नानंतर सासरला गेली एक दोन दिवस राहून मांडव परतणीसाठी माहेरी वापस आली. मुलीचा विवाह झाल्याने आईवडील बिनधास्त होते. नवरी परतीने आल्यानंतर नवरदेव 25 एप्रिल रोजी नववधुस घेण्यासाठी सावरगावला आला. मुक्काम केला. सकाळी आपल्या नववधुला घेऊन सासरी जाणार होता. पण सकाळी नैसर्गिक विधीला जाण्याचे निमित्त करुन नववधुने गावातील प्रियकरासोबत धूम ठोकली.