नवी दिल्ली – आम आदमी पक्षाला पंजाब विधानसभा निवडणुकांमध्ये मिळालेल्या घवघवीत यशानंतर पक्षाने आता गुजरात विधानसभा निवडणुकांसाठी जोरदार तयारी सुरु केल्याचे दिसत आहे. अशातच पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी रविवारी गुजरातेतील भरूच येथे जाहीर सभा घेतली. यावेळी बोलताना केजरीवाल यांनी गुजरातेत बदल घडवून आणणार असल्यासाची घोषणा केली. ते म्हणाले, ‘दिल्लीतील शाळांचे मॉडेल हे पंजाबमध्ये अत्यंत यशस्वी ठरले आहे. गुजरातेतील सरकारी शाळांची अवस्था अत्यंत दयनीय असून ६ हजार शाळा बंद करण्यात आल्या आहेत. कित्येक शाळा जीर्ण अवस्थेत सुरु आहेत. लाखो विद्यार्थ्यांचं भवितव्य अंधारात आहे.’
पुढे बोलताना केजरीवाल यांनी, ‘गुजरातेत परीक्षांदरम्यान पेपरफुटीची प्रकरणे समोर येतायेत. याबाबत गुजरातने जागतिक विक्रम केलाय’ असा आरोप लगावला. गुजरातमध्ये एक तरी परीक्षा पेपरफुटी विना घेण्याचं आव्हान केजरीवाल यांनी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांना दिलं. मला एक संधी द्या शाळा सुधारल्या नाहीत तर माझी हकालपट्टी करा असं आवाहन त्यांनी जनतेला केलं.
दिल्लीतील ४ लाख विद्यार्थी खासगी शाळांमधून दिल्लीच्या सरकारी शाळांमध्ये स्थलांतरित झाल्याचा दावा केजरीवाल यांनी केला, “दिल्लीमध्ये गरीब आणि श्रीमंतांची मुले एकत्र शिकत आहेत. यावेळी दिल्लीत उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९९.७% होती.” केजरीवाल म्हणाले की भाजपचे लोक व्हॉट्सऍपवर “केजरीवालांच्या सरकारी शाळा खराब आहेत..” असा अपप्रचार करतायेत मी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना आमंत्रित करतो. त्यांनी यावं आमच्या शाळा आणि रुग्णालये पहावीत, बिनबुडाची टीका करू नये.
विशेष म्हणजे दिल्लीबाहेर पहिल्या यशानंतर केजरीवाल गुजरातमधील आदिवासी भागात आपला ठसा उमटवण्यासाठी सतत प्रयत्न करत आहेत. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने राज्यातील 27 आदिवासीबहुल जागांपैकी 15 जागा जिंकल्या होत्या. गेल्या महिन्यात, AAP ने दावा केला होता की त्यांच्या अंतर्गत सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पक्ष गुजरातमध्ये सुमारे 58 जागा जिंकण्याची शक्यता आहे.