पुणे- देशभरात सध्या मान्सूनपूर्व नैसर्गिक हालचाली सरासरी 43 ते 45 टक्क्यांनी घटल्याने हवामान संशोधकांनी म्हटले आहे. यात विशेषत: वारा, वादळ आणि पाऊस या घटना गृहित धरल्या जातात. पण, यंदा या घटनांचे प्रमाण घटले आहे. तर, दुसऱ्या बाजूला उष्णतेच्या प्रकोप वाढला आहे. ही स्थिती पाहता यंदा देशभरात मान्सून म्हणजेच मोसमी पावसाला पूरक वातावरण असल्याचा दावा हवामान अभ्यासक करत आहेत.
असाही एक निष्कर्ष…
हवामान अभ्यासकांच्या मते, “ज्या भागात मान्सूनपूर्व हालचाली कमी असतात तेथे मान्सून चांगला राहण्याचा अंदाज आहे याचा कोणताही शास्त्रीय संबंध जोडता येणार नाही. पण, संशोधकांच्या अभ्यासाचा तो एक अंदाज आणि निष्कर्ष आहे.
उन्हाळ्यातील पावसात लक्षणीय घट
देशभरात उन्हाळी हंगामात सुमारे 43 टक्के कमी पाऊस नोंदवला गेला आहे. तर, उत्तर भारत आणि पश्चिम भारतात हे प्रमाण तब्बल 91 टक्के राहिले आहे. मध्य भारतात हे प्रमाण सरासरी 81 टक्के राहिले आहे. त्यामुळे उष्णतेचे प्रमाण वाढले आहे.
उष्णतेचे नवे रेकॉर्ड
यंदा पंजाब, हरियाणा, राजस्थान, गुजरात, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात उष्णतेचे यंदा नवे रेकॉर्ड झाले आहेत. शिवाय, मान्सूनपूर्व कालावधीचे जवळपास 2 महिने संपले आहेत. या काळात उष्णतेव्यतिरिक्त फारशा घडामोडी घडलेल्या नाहीत. त्यातच मान्सूनपूर्व हालचालींच्यास दृष्टीने महत्त्वाचे मार्च ते मे कालावधीतील 2 महिने संपले आहेत.
समुद्रात उष्ण लहरी
हिंदी महासागर आणि बंगालच्या उपसागरात सध्या उष्ण लहरींचे प्रमाण वाढत आहे. या सर्वांचा परिणाम मान्सूनवर सकारात्मक होणार असल्याची संशोधकांना आशा आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी संस्थेने याबाबत अभ्यास केला आहे. समुद्री उष्ण लहरी, समुद्राचे वाढते तापमान, एल-निनो यामुळे मध्य भारतात अवर्षणाची स्थिती वाढणे, तर भारतीय द्वीपकल्पाच्या दक्षिण भागात पावसाचे प्रमाण वाढत असल्याचे या संशोधनात म्हटले आहे.
एखाद्या वादळाची शक्यता
दरम्यान, काही हवामान अभ्यासकांच्या मते, “सध्या देशात अनेक राज्यांमध्ये सातत्याने तापमानात चढ-उतार नोंदवले जात आहेत. यात काही प्रदेशांत दर 8-10 दिवसांनी तापमान अचानक घसरेल. तर, काही ठिकाणी पाऊसही पडण्याची शक्यता आहे. मधल्या काळात एखादे छोटे वादळ निर्माण होण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे काही प्रदेशांत उष्णतेपासून थोडासा दिलासा मिळू शकतो.’