श्रीनगर – जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा रक्षकांबरोबर झालेल्या चकमकीत अल बद्र या दहशतवादी संघटनेच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला असल्याचे पोलिसांनी सांगितले. बुधवारी संध्याकाळी ही चकमक झाली. पुलवामा जिल्ह्यातील मित्रीगाम गावात दहशतवादी असल्याची माहिती मिळताच पोलीस तेथे पोचले आणि त्यांनी नाकाबंदी करून शोधमोहिम सुरू केली.
त्यावेळी विरुद्ध बाजूकडून गोळीबार सुरू झाला, त्यानंतर झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले, असे पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी सांगितले. आज ठार झालेल्या दहशतवाद्यांकडून दोन एके-47 रायफली हस्तगत करण्यात आल्या आहेत.
या महिन्यात 14 एप्रिलला शोपियन जिल्ह्यातल्या चकमकीमध्ये चार दहशतवादी मारले गेले होते. आज टार झालेले दहशतवादी हे त्यांच्याच गटाचा भाग होते, असेही विजय कुमार यांनी सांगितले.रविवारी पुलवामामध्ये झालेल्या चकमकीत लष्कर ए तोयबाचा कमांडर आणि एका पाकिस्तानी दहशतवाद्यासह एकूण तीन दहशतवादी मारले गेले होते.