मुंबई – उत्तर प्रदेशमध्ये योगी सरकारच्या निर्देशानंतर मंदिर आणि मशिदींवरील अनधिकृत भोंग्यांवर धडक कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्या भोंगे उतरवण्याच्या कारवाईनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे कौतुक करत महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. उत्तर प्रदेशातील धार्मिक स्थळांवरील, विशेषत: मशिदींवरील भोंगे उतरवल्याबद्दल योगी सरकारचे मन:पुर्वक अभिनंदन आणि आभार, अशा शब्दांत राज ठाकरे यांनी योगींचे कौतुक केले आहे. तसेच आमच्या महाराष्ट्रात “योगी’ कुणीच नाहीत. आहेत ते फक्त सत्तेचे “भोगी’! महाराष्ट्र सरकारला सदबुद्धी मिळो, हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना, असा शब्दांत त्यांनी हल्लाबोल केला.
मनसेच्या गुढीपाडव्याच्या सभेत राज ठाकरे यांनी हिंदूत्वाचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवत मशिदींवरील भोंगे उतरवा अन्यथा मशिदींसमोर मोठ्या आवाजात हनुमान चालीसा वाजवू असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर मनसेने आक्रमक भूमीका घेत राज्यभरात मशिदींसमोर हनुमान चालीसा लावला. शिवाय भाजपनेही उघडपणे राज ठाकरेंच्या या भूमीकेला पाठींबा दिला होता.
तर सत्ताधाऱ्यांकडून राज ठाकरे धार्मिक तेढ निर्माण करत असल्याचा आरोप करत टीका करण्यात येत होती.दरम्यान, राज ठाकरेंच्या या वक्तव्यानंतप उत्तर प्रदेशमध्ये भोंगे उतरवण्यात आले. त्यानुसार आता महाराष्ट्रातही ठाकरे सरकार भोंगे उतरवणार का? तसेच राज ठाकरेंच्या या कौतुकानंतर मनसे-भाजपा युतीच्या चर्चांना उधाण आले आहे. त्यामुळे येत्या काळात मनसे-भाजपा युती होणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.