मुंबई – खासदार नवनीत राणा या कायद्याच्या कचाट्यात अडकल्यामुळे त्यांना आता जात आठवली. तुमचं ढोंगी राजकारण जनतेने ओळखलं आता जनता तुम्हाला अमरावती मधील निवडून देणार नाही. अशी टीका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात गटाचे अध्यक्ष सचिन खरात यांनी केली आहे
संविधाननिर्माता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दलित, शोषित समाजाला इतर समाजाच्या बरोबरीने येण्यासाठी आरक्षण दिले परंतु याच आरक्षित जागेवर नवनीत राणा निवडून येऊन दलित समाजाचे प्रश्न सोडविण्याऐवजी धार्मिक राजकारण करत असून धर्माचे अवडंबर करत आहे हे संविधानाला अभिप्रेत नाही. परंतु ज्यावेळेस त्या कायद्याच्या कचाट्याच सापडल्या त्यावेळीस आता यांना जात आणि समाज आठवत आहे. त्यामुळे हे तुमचे ढोंगी राजकारण अमरावती मधील नागरिकांनी ओळखले आहे. ही जनता आता तुम्हाला खासदार म्हणून निवडून देणार नाही हे ध्यानात ठेवा, असे देखील सचिन खरात यांनी म्हटले आहे.
दरम्यान, हनुमान चालिसावरून मागील काही दिवसांपासून महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघत आहे. त्यातच अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानासमोर हनुमान चालिसा पठण करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर या दाम्पत्याला अटक करण्यात आली. मात्र अटकेनंतर नवनीत राणा यांनी पोलिस प्रशासनावर आरोप केले. न्यायालयीन कोठडीत असलेल्या नवनीत राणा यांनी आपल्याला कोठडीत पोलिसांकडून अपमानास्पद वागणूक मिळाल्याचा आरोप केला होता. तसेच आपण मागासवर्गीय असल्याने रात्रभर पाणी दिले गेलं नाही. बाथरूमला देखील जाऊ दिलं नाही, असा गंभीर आरोप नवनीत राणा यांनी केला होता.