नवी दिल्ली – देशात काही ठिकाणी जाणिवपुर्वक करण्यात आलेली बुलडोझर कारवाई ही देशातील कायदा आणि सुव्यवस्था स्थिती पुर्ण मोडीत काढणारी ठरली असून ही कारवाई केवळ मुस्लिम आणि गरीबांनाच लक्ष करणारी होती अशी टीका माजी गृहमंत्री व ज्येष्ठ कॉंग्रेस नेते पी चिदंबरम यांनी केली आहे.
आज पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी म्हटले आहे की, दिल्लीतील जहांगीर पुरी आणि मध्यप्रदेशातील खरगोन येथे करण्यात आलेली बुलडोझर कारवाई ही अतर्क्य स्वरूपाची आहे आणि कायद्याच्या भाषेत तिला कोणतेही स्थान नाही असे चिदंबरम यांनी नमूद केले. कायद्याच्या प्रक्रियेचे यात घोर उल्लंघन करण्यात आले आहे असे ते म्हणाले.
देशात आता बुलडोझर राजकारण हा एक नवीन शब्दप्रयोग यातून निर्माण झाला आहे असे ते म्हणाले. ते म्हणाले की अतिक्रमण किंवा बेकायदा बांधकाम काढून टाकण्याच्या संबंधातही एक कायदेशीर प्रक्रिया पार पाडावी लागते.
त्यात संबंधीत अतिक्रमणाची माहिती मिळवणे, त्याबद्दल संबंधीतांना नोटीस बजावणे, त्याला हरकत नोंदवण्यास संधी देणे आणि त्यानंतर प्रत्यक्ष पाडापाडीचे आदेश देणे या पायऱ्या त्यात असतात. ती कोणतीही प्रक्रिया पार न पाडता बेधडक पाडापाडी करणे हा पुर्णपणे कायद्याचा भंग आहे असे ते म्हणाले.