औंध – औंध, बाणेर परिसरात स्मार्ट सिटीकडून विविध प्रकल्प पूर्ण केले गेले. त्यानंतर ते पुणे महानगरपालिकेकडे वर्ग केले गेले आहेत. परंतु, अशा प्रकल्पांची देखभाल, दुरुस्ती कोणी करायची? या वादामध्ये मोठ्या प्रमाणात खर्च करून उभारलेल्या प्रकल्पांची दुर्दशा होत आहे.
औंध परिसरामध्ये “स्मार्ट सिटी’ अंतर्गत अनेक कामे करण्यात आली आहेत. यामध्ये रस्ते तसेच पदपथ, दुभाजकांचे सुशोभीकरणाचीही कामे करण्यात आली आहेत. यानुसार दुभाजकामध्ये शोभेची झाडे लावण्यावरही निधी खर्च करण्यात आला. परंतु, मोठा निधी खर्च करून लावण्यात आलेली शोभेच्या फुलांची झाडे देखभाली अभावी करपू लागली आहेत. तसेच, छाटणीची कामे झाली नसल्याने ही झाडे रस्त्यावर आली असून दुचाकीस्वारांना याचा अडथळा होत आहे. दुभाजकामध्ये अस्ताव्यस्त वाढलेल्या या झाडांमुळे वाहन चालक त्रस्त झाले आहेत. झाडे घासली जात असल्यामुळे छोट्या-मोठ्या जखमा होत आहेत, चार चाकी वाहनांनाही स्क्रॅच पडत आहेत.
मागील वर्षी स्थानिक नगरसेविका अर्चना मधुकर मुसळे यांनी अशा झाडांच्या छाटणीसाठी पाठपुरावा केला होता. परंतु, त्यांना कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद न मिळाल्यामुळे त्यांनी स्वखर्चातून या झाडांच्या छाटणी खर्च केला होता, यावेळी मात्र प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष आहे.