प्रत्येक प्राणीमात्रात ज्याचा वास म्हणजे निवास असतो, जो रमण करतो त्याला राम असे म्हटले जाते. म्हणजेच राम हा प्रत्येक प्राणीमात्राशी आणि मानवसमूहाशी निगडित आहे. प्रभू रामचंद्र आणि सीता यांची कथा आणि संघर्षमय मूल्य प्रस्थापनेची कथा आहे. एकवचनी, एकबाणी, एकपत्नी असे प्रभू रामचंद्र मर्यादा पुरुषोत्तम होते. त्यांनी राज्य केले तेही काही मर्यादांचे पालन करीत केले. नीतीमत्ता व आचारतत्त्वे कधीच पायदळी तुडवली नाहीत. आपल्या प्रजेचे कल्याण करण्यावर त्यांनी भर दिला. अयोध्येत परतल्यानंतर त्यांचा राज्यकाळ हा अत्यंत कल्याणकारी राज्यव्यवस्थेचा आदर्श होता. “प्रभू रामचंद्रानी जो संघर्ष केला तो केवळ सत्तेसाठी नव्हता तर मूल्यासाठी होता.
भारतीय संस्कृतीमध्ये ज्या व्यक्तिमत्त्वाचा करिश्मा सदैव कायम राहिला आहे त्यामध्ये प्रभू श्रीरामचंद्रांचा समावेश अग्रक्रमाने होतो. प्रभू रामचंद्रांना भारतीय परंपरेतील विष्णूच्या दहा अवतारांपैकी सातवा अवतार मानण्यात येते. प्रत्येक प्राणीमात्रात ज्याचा वास म्हणजे निवास असतो, जो रमण करतो त्याला राम असे म्हटले जाते. म्हणजेच राम हा प्रत्येक प्राणीमात्राशी आणि मानवसमूहाशी निगडीत आहे. वनवासाच्या काळात प्रभू रामचंद्रांना वनवासींनी खूप सहाय्य केले होते. भारतात सुदूर पसरलेल्या डोंगराळ भागात वनवासींच्या आदर्श आणि अद्भुत शक्तीने भारतीय मूल्यांची प्रस्थापना करून मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांना लोकहृदयात अधिष्ठित केले. वाल्मिकींनी “रामायण’ लिहून प्रभू रामचंद्राला साहित्याच्या दालनात अमर केले. तर तुलसीदासाने रामचरित मानस हा ग्रंथ लिहून संपूर्ण हिंदी भाषक उत्तर भारतात प्रभू रामचंद्रांना मध्ययुगातही अजरामर करून ठेवले. मराठीमध्ये ग. दि. माडगूळकरांनी रचलेल्या “गीत रामायणा’ने तीन पिढ्यांवर गारूड केले. तसेच दक्षिणेतील आंध्रप्रदेश, तमीळनाडूसारख्या राज्यातही “रामायणा’चा लोककला-लोकजीवनात समावेश दिसून येतो.
पी. व्ही. वर्तक यांनी “इतिहासाचे वास्तव’ लिहून रामचंद्रांच्या जन्मापासून ते महानिर्वाणापर्यंत अनेक घटनांचे सत्य पुराव्यांच्या आधारे नव्याने उकल करण्याचा प्रयत्न केला. इंदिरा गांधींच्या नेतृत्वाच्या काळात बी. बी. लाल यांनी रामायण पुरातत्त्व हा प्रकल्प राबवला. त्यांनी रामायण प्रत्यक्षात घडून आले आहे आणि त्याचे पुरावे पुरातत्त्वदृष्ट्या उपलब्ध आहेत हे सिद्ध केले. डी. सी. सरकार ऊर्फ दिनेशचंद्र सरकार यांचे असे मत होते की, रामायण प्रत्यक्षात घडले आहे. पण महाभारत मात्र मिथक आहे. पुरातत्त्व शास्त्रज्ञांनी केलेल्या सर्वेक्षणातून रामायण आणि महाभारत या दोहोंमधील प्रत्यक्षात घडल्याचे स्पष्ट झाले आहे. अनेक शहरातील पुरातत्त्व अवशेषातून त्यांचा आढळ होत असल्याचे सिद्ध केले आहे. महर्षी वाल्मिकी यांनी लिहिलेले रामायण आणि व्यासांनी लिहिलेले महाभारत या केवळ दंतकथा आहेत आणि त्याचा इतिहासाशी काही संबंध नाही अशी पाश्चात्यांची धारणा भारतीय संस्कृतीबद्दल अविश्वास निर्माण करणारी होती. परंतु पुरातत्त्व संशोधनांनी त्या केवळ महाकथा नव्हत्या हे सिद्ध केले आहे.
प्रभू रामचंद्राचा जन्मकाळ
डॉ. पी. व्ही. वर्तक यांनी “इतिहासाचे वास्तव’ या ग्रंथात असे म्हटले आहे की, रामाच्या काळात हिमालय आणि विंध्य पर्वताची उंची सारखीच होती. परंतु आता दर वर्षी हिमालयाची उंची तीन फुटाने वाढते. त्यामुळे हिमालय उंच तर विध्य पर्वत आहे त्याच उंचीचा आहे. या सर्वांचा अंदाज घेऊन त्यांनी पुरातत्त्व दृष्टीने प्रभू रामचंद्राच्या जन्माची तारीख लिहिली. त्यांच्या मते इ. स. पूर्व 4 डिसेंबर 7323 ही तारीख प्रभू रामचंद्राच्या जन्माची आहे. अलीकडे पुरातत्त्व खात्याने प्लॅटिनम सॉफ्टवेअरचा वापर करून प्रभू रामचंद्राची जन्मतारीख काढली आहे. त्यानुसार प्रभू रामचंद्रांचा जन्म इ. स. पूर्व 10 जानेवारी 5114 या दिवशी झाला.
रामकथेतील अद्भुतता
दशरथाचा पुत्र राम हा कौत्सल्येचा मुलगा होता आणि कैकयीच्या आग्रहाखातर भरताला राज्यावर बसवण्यासाठी दशरथाने रामचंद्रास 14 वर्षांसाठी वनवासात पाठवले. त्यावेळी भरताने मोठ्या भावाचा आदर्श ठेवत त्याच्या पादुका घेतल्या आणि राज्य केले. वडिलांचा आणि आईचा आदर करण्यासाठी रामचंद्रांनी वनवास पत्करला तेव्हा उत्तरेकडून दक्षिणेकडे प्रवास केला. त्या काळात त्यांचे बंधू लक्ष्मणही त्यांच्यासमवेत राहिले. पुढे लंकेचा राजा रावण याने सीतेचे अपहरण केले. रामाने तिचा शोध घेऊन रावणाचा वध करून सीतेला मुक्त केले. हा सगळा संघर्षमय काळ वनवासात घडून आला.
प्रभू रामचंद्र दंडकारण्यात वनवासात असताना त्यांची आणि अगस्ती ऋषी यांची भेट गोदावरीतीरी झाली अशी आख्यायिका सांगितली जाते. तसेच प्रभू रामचंद्रांना दक्षिणेत प्रवास करण्यास तुळजापूरच्या तुळजाभवानीने दिशादर्शन केल्याचे “तुळजा महात्म्य’ या संस्कृत ग्रंथात नमूद केले आहे. त्यामुळे तुळजाभवानीला रामवरदायिनी असे म्हटले जाते.
प्रभू रामचंद्रांनी वानरांच्या साहाय्याने सेना उभारली आणि त्यांच्या मदतीने सेतू बांधला ही दंतकथा असे समजले जात होते. तथापि, नासा या अमेरिकन संशोधन संस्थेने फ्लोरिडा येथून उपग्रहाद्वारे काढलेल्या छायाचित्रात सागरामध्ये दक्षिणेतील रामेश्वरपासून कोलंबोपर्यंत उत्तम पद्धतीने रामसेतू उभारल्याचे सबळ सज्जड पुरावे आढळले आहेत. त्यावरून रामाने बांधलेला सेतू ही कपोलकल्पित गोष्ट नसून प्रत्यक्षात घडलेली आहे हे स्पष्ट होते.
प्रभू रामचंद्रांना विश्वासाने मदत करणारा हनुमान दक्षिणेतील प्रवासात भेटला आणि तो प्रभू रामचंद्रांचा भक्त झाला. प्रभू रामचंद्रांनी वानरसेना उभी केली याचा मतितार्थ असा आहे की, प्रभू रामचंद्रांना दंडकारण्यात 14 वर्षे वनवासात वनवासींनी मदत केली आहे. वनातील मूळ रहिवासी असलेल्या भारतीय लोकांनी प्रभू रामचंद्रास त्यांच्या सुरक्षेसाठी, भविष्यासाठी आणि त्यांच्या सांस्कृतिक मूल्यासाठी मोठ्या प्रमाणात साथ दिली. त्यांच्याबरोबर संचार केला आणि श्रीलंकेपर्यंत म्हणजे सीतेच्या शोधाच्या अंतिम टप्प्यापर्यंत त्यांना पोहोचवण्यामध्ये महत्त्वाचे योगदान दिले.
हनुमान या प्रभावशाली आणि विश्वासू सहकाऱ्याचा उदय ही देखील यातील महत्त्वाची बाब होय. अशा वनवासींचा हा नायक हनुमान म्हणजे एक प्रभावी शक्तीचे प्रतीक मानला जातो. त्याने केलेले उड्डाण आणि एका करंगळीवर आणलेला गोवर्धनगिरी पर्वत आणि त्यातील औषधींचा त्याने घेतलेला शोध हे सर्वच अद्भुत आणि रोमांचकारी आहे. प्रभू रामचंद्रांच्या चरित्रातील काही प्रसंगाच्या बाबतीत अत्यंत महत्त्वाचे संदर्भ सापडलेले आहेत. हे संदर्भ इतिहास उलगडण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरतात. प्रभू रामचंद्रानी जो संघर्ष केला तो केवळ सत्तेसाठी नव्हता तर मूल्यासाठी होता, हे रामायणातून लक्षात येते.
दुसरे महत्त्वाचे सूत्र म्हणजे प्रभू रामचंद्रांचा अंतिम काळ किंवा त्यांचे महानिर्वाण हे जलसमाधी तत्त्वानुसार घडून आले. आपले ऐतिहासिक कार्य संपवल्यानंतर प्रभू रामचंद्रांनी शरयू नदीत प्रवेश केला आणि या नदीच्या खोल पात्रात जाऊन त्यांनी आपल्या जीवनाची इतिश्री केली. प्रभू रामचंद्र आणि सीता यांची कथा आणि संघर्षमय मूल्य प्रस्थापनेची कथा आहे. एकवचनी, एकबाणी, एकपत्नी असे प्रभू रामचंद्र मर्यादा पुरुषोत्तम होते. त्यांनी राज्य केले तेही काही मर्यादांचे पालन करीत केले. नीतिमत्ता व आचारतत्त्वे कधीच पायदळी तुडवली नाहीत. आपल्या प्रजेचे कल्याण करण्यावर त्यांनी भर दिला. अयोध्येत परतल्यानंतर त्यांचा राज्यकाळ हा अत्यंत कल्याणकारी राज्यव्यवस्थेचा आदर्श होता. ज्या काळात अंधार होता त्या काळात प्रभू रामचंद्रांनी मानवता, लोककल्याण ही मूल्ये घेऊन आपला राज्यव्यवहार चोखपणाने केला.
प्रभू रामचंद्रांचे पुत्र लव आणि कुश यांनी त्यांचा अश्वमेधाचा घोडा अडवला आणि प्रभू रामचंद्रांपेक्षाही आपण काकणभर सरस आहोत हेच सिद्ध केले. हा अश्वमेधाचा घोडा जिथे अडवला ते स्थान औरंगाबादेतील सिल्लोड जवळील लवगड नांद्रा हे स्थान म्हणून दाखवले जाते. सीतेच्या अपहरणाची गोष्ट साकारणाऱ्या कथा बीड जिल्ह्यात प्रसिद्ध आहेत.
ज्या जटायूने ही बातमी प्रभू रामचंद्राला सांगितली आणि मगच प्राण सोडला त्या जटायूचे मंदिरही बीड जिल्ह्यात आहे. यावरून प्रभू रामचंद्राच्या आयुष्यातील लहान लहान प्रसंगही प्रत्यक्ष पुराव्यानिशी ठिकठिकाणी आपणांस आढळून येतात. त्यांचा पुरातत्त्वीय शोध घेऊन या प्रसंगाच्या आधारे रामायणातील प्रसंग आणि प्रत्यक्ष भारतीय पुरातत्त्व यांचे नाते असल्याचे बी. बी. लाल यांनी प्रथमदर्शनी सिद्ध केले. त्यानंतर प्रभू रामचंद्रांशी निगडीत असलेली पुरातत्त्व जागा, स्थळे यांच्या अभ्यासाचे एक नवे दालनच उभे राहिले.
प्रभू रामचंद्रांच्या तत्त्वांचा, ध्येय उद्दिष्टांचा, मूल्यांचा परामर्श घेतला असता असे दिसते की, प्रभू रामचंद्रानी आदर्श मूल्यांसाठी उत्कृष्ट, लोककल्याणकारी राज्य चालवले त्यामुळेच त्यास रामराज्य असे म्हटले आहे. महात्मा गांधीही अशाच रामराज्याचे पुरस्कर्ते होते आणि प्रभू रामचंद्रांच्या उच्च ध्येयवादाचे आणि मूल्यांचे पुरस्कर्ते होते. भारतीय संस्कृतीच्या देशी किंवा परदेशी अभ्यासकांनीही प्रभू रामचंद्रांच्या ध्येयवादी विचारांचा परामर्श घेताना त्यांच्यातील दीपस्तंभाची उंची विचारात घेतल्याचे दिसते.
प्रभू रामचंद्रांचा आयुष्यकाळ त्रिपुरापासून रामेश्वरपर्यंत, रांचीपासून कराचीपर्यंत ब्रह्मदेशापासून गांधार देशापर्यंत सर्वदूर पसरला आहे. याचाच अर्थ अखंड भारताच्या उभारणीचा श्रीगणेशा प्रभू रामचंद्रांसारख्या आदर्श व ध्येयवादी राजाने केला, असे म्हणता येईल. अशा या मर्यादा पुरुषोत्तम रामाच्या जीवनकार्याचे गुणगान वनवासी अव्याहतपणे गात आहेत, प्रचलित करीत आहेत. मध्य प्रदेशातील वनवासी जमातीमध्ये जन्माला आलेला मुलगा किंवा मुलगी चार पाच वर्षांची असतानाच रामकथा सांगू लागते. हा चमत्कार नसून त्यांच्यातील जनुकांचा तो अभ्युदय असतो आणि अशी जनुके भारतीय वनवासींमध्ये भारतीय संस्कृतीबद्दल रुजवल्यामुळे या वनवासी जमाती पाश्चात्य धर्मापासून दूर राहिल्या आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीही त्यांनी भारतीय मूल्यांची ध्वजा फडकत ठेवली.
– सु. ल. हिंगणे