नवी दिल्ली – पाच राज्यांमधील विधानसभेच्या निवडणूकीच्या मुद्यावरून केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी कॉंग्रेस पक्षावर जोरदार टीका केली आहे. गांधी कुटुंबाच्या बाहेर कॉंग्रेस पक्ष अस्तित्वातच नाही, असे ठाकूर यांनी म्हटले आहे.
राहुल गांधी यांनी पक्षाचे नेतृत्व स्वीकारले. मात्र पश्चिम बंगालमध्ये पक्षाला काहीही जागा मिळवता आल्या नाहीत. प्रियांका गांधींनी उत्तर प्रदेशात कॉंग्रेस पक्षाचे नेतृत्व केले मात्र केवळ दोन जागाच जिंकता आल्या.
आता पुन्हा सोनिया गांधींनी पक्षाचे नेतृत्व स्वीकारले आहे. कॉंग्रेस पक्षामध्ये नक्की काय चालले आहे? या पक्षाचे नेतृत्व कधीपर्यंत केवळ एकाच कुटुंबापर्यंत मर्यादित राहणार आहे? हाच एक मूलभूत प्रश्न शिल्लक राहिला आहे, असे अनुराग ठाकूर यांनी म्हटले आहे.
कॉंग्रेस पक्षाची जी वाताहत झाली आहे, त्याचे कारण कॉंग्रेस पक्षाकडेही नाही, अशा शब्दात ठाकूर यांनी पक्षाच्या स्थितीची खिल्ली उडवली. महागाईच्या मुद्यावरून कॉंग्रेस पक्षाने जे प्रस्न उपस्थित केले त्याच्या संदर्भाने त्यांनी ही खिल्ली उडवली.