पुणे –महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या सर्व “ओएमएस’ बेस परीक्षांची कामे “विनर’ सॉफ्टवेअर प्रा.लि. कंपनीमार्फतच घेण्याचे मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाने शिक्कामोर्तब झाले आहे. यामुळे आता विविध प्रलंबित परीक्षा घेण्यातील तिढा सुटला असून परीक्षा जूनमध्येच घेण्यात येणार आहेत.
विविध परीक्षा घेण्याबाबतची जी.ए.सॉफ्टवेअर कंपनीची तीन वर्षांची मुदत संपल्यानंतर गेल्यावर्षी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. यात “विनर’ सॉफ्टवेअर कंपनीला टीईटी, इयत्ता पाचवी व आठवीची शिष्यवृत्ती, एनटीएस, एनएमएमएस, आरआयएमसी, डी.एल.एड या सर्वच परीक्षा घेण्याचे काम रितसर मिळाले. “टीईटी’ घोटाळ्याशी “विनर’कंपनीचा काहीही संबंध नसतानाही परीक्षा परिषदेने या कंपनीला नोटीस पाठवून काम थांबविले होते. “विनर’ सॉफ्टवेअर कंपनीने परीक्षांची कामे थांबविल्याबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायालयाने परीक्षा परिषदेला फटकारत “विनर’ कंपनीच्या बाजूनेच निकाल दिला.
मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार परीक्षा परिषदेतील परीक्षांची कामे पूर्वीच्या करारनाम्याप्रमाणे “विनर’ सॉफ्टवेअर या कंपनीमार्फतच करण्यात येणार आहेत. त्याबाबत कंपनीला कामाचे आदेशही दिले आहेत. एनटीएस, एनएमएमएस, पाचवी व आठवीची शिष्यवृत्ती या परीक्षा शाळा सुरू झाल्यानंतर जूनमध्येच घेण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. – दत्तात्रय जगताप, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद