कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपवर केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केल्याचा आरोप केला आहे. यासह त्यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून भगव्या पक्षाचा मुकाबला करण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले आहे.
ममतांनी ज्या नेत्यांना पत्रे लिहिली त्यात भाजपच्या एकाही नेत्याचा समावेश नाही. केंद्रीय यंत्रणांवर राजकीय सूडबुद्धीचा आरोप करत त्यांनी ही बैठक बोलावली आहे.
ममता यांनी पत्रात लिहिले आहे की, अंमलबजावणी संचालनालय, सीबीआय, केंद्रीय दक्षता आयोग (सीव्हीसी) आणि प्राप्तिकर विभाग यासारख्या केंद्रीय एजन्सींचा वापर सूड उगवण्यासाठी देशभरातील राजकीय विरोधकांना टार्गेट करण्यासाठी केला जातोय. त्यामुळे “आपण सर्वांनी मिळून भाजपला केंद्रीय संस्थांचा गैरवापर करण्यापासून रोखले पाहिजे, निवडणुका जवळ आल्या की, केंद्रीय संस्था कामात उतरतात, असही त्यांनी म्हटलं.
या पत्रात ममता बॅनर्जी यांनी लिहिलं आहे की, मला न्यायव्यवस्थेचा सर्वाधिक आदर आहे. मात्र सध्या राजकीय हस्तक्षेपामुळे लोकांना न्याय मिळत नाही, जे आपल्या लोकशाहीसाठी घातक आहे. न्यायव्यवस्था, प्रसारमाध्यमे आणि जनता हे आपल्या लोकशाही व्यवस्थेतील महत्त्वाचे स्तंभ आहेत. यापैकी कोणत्याही स्तंभाला तडा गेला तर संपूर्ण व्यवस्थाच कोलमडून पडते, असंही ममता यांनी म्हटलं.