भोपाळ – युद्धग्रस्त युक्रेनमधून परतलेल्या विद्यार्थ्यांना भारतातील विविध सरकारी आणि खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सरकारी खर्चाने प्रवेश देण्याची मागणी कॉंग्रेस खासदार दिग्विजयसिंह यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.
त्यांनी म्हटले आहे की, या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांनी युक्रेनस्थित वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी आधीच बराच पैसा खर्च केला आहे, त्यामुळे त्यांना येथील कॉलेजांमध्ये प्रवेश घेताना पुन्हा खर्च करणे परवडणारे नाही असे दिग्विजयसिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
या विद्यार्थ्यांना नियम शिथिल करून देशातील विविध खासगी आणि सरकारी महाविद्यालयांमध्ये एमबीबीएस अभ्यासक्रमांना प्रवेश देण्यासाठी केंद्राने विशेष योजना आखावी, असेही राज्यसभा सदस्य दिग्विजयसिंह यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. यासंदर्भात केंद्र सरकार योग्य तो निर्णय घेईल आणि या विद्यार्थ्यांच्या भवितव्याबाबतची अनिश्चितता दूर करेल, अशी आशाही दिग्विजयसिंह यांनी व्यक्त केली आहे.