पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सपावर टीका
हरडोई, (उत्तर प्रदेश) – 2014 ते 2017 पर्यंत “परिवारवाद्यांनी’ आपल्याला उत्तर प्रदेशसाठी काम करू दिले नाही, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजवादी पार्टीवर जोरदार टीका केली. हरडोई येथील प्रचार सभेमध्ये बोलताना पंतप्रधानांनी हरडोईचे नागरिक 10 मार्चला भाजपच्या विजयाची होळी साजरी करतील, असे भाकितही वर्तवले.
हरडोईच्या जनतेने दोनदा होळी साजरी करण्याची तयारी केली आहे. पहिल्यांदा भाजपच्या विजयाची होळी आगोदर 10 मार्चला साजरी केली जाईल, असे मोदी म्हणाले. डबल इंजिनचे सरकार कोणत्याही एका कुटुंबाशी संबंधित असणार नाही, तर ते केंद्रातील सरकारशी संबंधित असणार आहे. उत्तर प्रदेशात भाजपच्या सरकारने खूप काम केले, मात्र 2014 ते 2017 दरम्यान परिवारवादींनी आपल्याला साथ दिली नाही.
उत्तर प्रदेशातील खासदार असूनही आपल्याला उत्तर प्रदेशातील लोकांसाठी काम करू दिले गेले नाही, याचे आपल्याला दुःख वाटते आहे. जर या परिवारवादींना पुन्हा संधी दिली तर ते पुन्हा आपल्याला उत्तर प्रदेशच्या लोकांसाठी काम करू देणार नाहीत, असे मोदी म्हणाले.
पूर्वी व्यापाऱ्यांना माफियांची भीती होती. दिवस मावळायच्या आत घरी परत यावे, असे व्यापाऱ्यांना वाटत असे. आता हेच परिवारवादी जातीचे विष पसरवत आहेत. हे लोक खुर्चीसाठी आपल्याच कुटुंबात लढत आहेत. मात्र, उत्तर प्रदेशचा विकास हा देशाचा विकास आहे, हे ध्यानात ठेवावे, असेही मोदी म्हणाले.