नवी दिल्ली : पंजाबमधील मतदानामुळे निकाल वगळता तीन राज्यांमधील निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली. उत्तराखंड आणि गोव्यात याआधीच मतदान झाले आहे. आता उत्तर प्रदेशातील चार टप्प्यांचे आणि मणिपूरमधील दोन्ही टप्प्यांचे मतदान बाकी आहे. मणिपूर तसे छोटे अन् राजकीयदृष्ट्या फार मोठे महत्त्व नसलेले राज्य. त्याउलट उत्तर प्रदेशची स्थिती. त्यामुळे राजकीय पक्षांचा आणि प्रमुख नेत्यांचा संपूर्ण फोकस यापुढे उत्तर प्रदेशवर राहील.
उत्तर प्रदेशसह पाच राज्ये एकाच वेळी विधानसभा निवडणुकांना सामोरी गेली. इतर चार राज्ये तशी छोटेखानीच. मात्र, उत्तर प्रदेशमुळे सध्याच्या विधानसभा निवडणुकांकडे 2024 मधील लोकसभा निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून पाहिले जात आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे राष्ट्रीय राजकारणात उत्तर प्रदेशला असलेले महत्त्व. लोकसभेच्या एकूण 543 जागा आहेत. त्यातील सर्वाधिक 80 जागा उत्तर प्रदेशात आहेत. साहजिकच, उत्तर प्रदेशात राजकीय वर्चस्व असणाऱ्या पक्षाचा राष्ट्रीय पातळीवरील दबदबा वाढतो.
मागील विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवून भाजपने उत्तर प्रदेशची सत्ता काबीज केली. आता ती सत्ता राखण्याचे मोठे आव्हान भाजपपुढे आहे. समाजवादी पक्ष आणि राष्ट्रीय लोक दलाची आघाडी भाजपला कडवी लढत देईल, असे सध्याचे चित्र आहे. बसप आणि कॉंग्रेस या पक्षांनीही चांगली कामगिरी करून दाखवण्यासाठी संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. त्याशिवाय, आप आणि इतर पक्षही रिंगणात आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेश निवडणूक अतिशय रंगतदार बनली आहे.
आतापर्यंत राजकीय पक्षांच्या स्टार प्रचारकांना इतर राज्यांतही प्रचार करावा लागत होता. मात्र, आता त्यांना उत्तर प्रदेशातील प्रचारासाठी अधिक वेळ देणे शक्य होणार आहे. त्यामुळे आगामी काळात उत्तर प्रदेशच्या निवडणूक रणांगणात प्रचाराच्या तोफा आणखी जोराने धडाडतील. त्यामुळे प्रमुख नेत्यांच्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींमुळे आणखी पंधरवडाभर ते राज्य केंद्रस्थानी असेल.