ठाणे – कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेच्या निवडणुकांच्या तोंडावर भाजपासमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे. येथे भाजपाला मोठं खिंडार पडलं असून गेल्या दोन महिन्यांत भाजपाच्या 6 विद्यमान आणि 2 माजी नगरसेवकांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. हे सर्व नगरसेवक शिवसेनेत जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. नगरसेवकांच्या या पक्षांतरामुळे निवडणुकांच्या तोंडावर भाजपासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.
आज सकाळीच कल्याण-डोंबिवली पालिकेतील भाजपचे माजी नगरसेवक नितीन पाटील व त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका रंजना पाटील यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्यासोबत नितीन पाटील यांचे बंधू आणि काँग्रेसचे माजी नगरसेवक रवी मट्या पाटील हेही पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत डोंबिवलीमध्ये शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. गेल्या दोन महिन्यांत भाजपमधून शिवसेनेत गेलेल्या आजी-माजी नगरसेवकांची संख्या आता आठ झाली आहे.
दरम्यान, नगरसेवकांच्या पक्षांतराची संख्या अजून वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजपाचे अजून काही नगरसेवक शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर पालिका निवडणुकांच्या तोंडावर पक्षाला लागलेली गळती रोखण्याचे आव्हान भाजपासमोर आहे.