आळंदी – वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक सद्गुरू जोग महाराज यांच्या शतकोत्तर पुण्यतिथी महोत्सवाची गुरुवारी काल्याच्या कीर्तनाने सांगता झाली. सप्ताहात सात दिवस हभप कृष्णा महाराज नवले, हभप मारुतीबाबा कुऱ्हेकर, हभप माणिकबाबा शास्त्री, हभप चैतन्य महाराज देगलूरकर, तुकाराम महाराज जेउरकर, बबन महाराज म्हस्के, गोविंद महाराज चौधरी यांची कीर्तनसेवा झाली. आळंदीसह पंचक्रोषीतील भाविक सप्ताहात सात दिवस हरिनामात दंग झाले होते.
जोग महाराज यांचे पूर्ण नाव विष्णु नरसिंह जोग आहे. त्यांनी 1917साली तीर्थक्षेत्र आळंदी येथे वारकरी शिक्षण संस्थेची स्थापना केली. बंकटस्वामी महाराज, मारोती बुवा गुरव, लक्ष्मण बुवा इगतपुरीकर, मामासाहेब दांडेकर हे त्यांचे पहिले चार शिष्य होते. तेंव्हापासून आजपर्यंत या संस्थेतून हजारो विद्यार्थी शिक्षण घेऊन समाजात कीर्तन, प्रवचनाच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे कार्य करत आहेत. शिक्षकांना वेतन नाही आणि विद्यार्थ्यांना शुल्क नाही हे या संस्थेचे मुख्य वैशिष्ट्य आहे. दरम्यान, पुण्यतिथी महोत्सवाला संस्थेतून शिक्षण घेतलेले सर्व विद्यार्थी एकत्र येऊन महोत्सव साजरा करतात. महाराष्ट्रातील सर्वात मोठा सप्ताह अशी या सप्ताहाची ओळख आहे.