मुंबई – उत्तर केरळ ते मराठवाडादरम्यान कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. ईशान्येकडील वाऱ्यांमुळे मराठवाडा आणि विदर्भात 19 आणि 20 फेब्रुवारी रोजी तुरळक पावसाची आणि आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे, अशी माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे.
परभणी, बीड, नांदेड आणि लातुरात काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भातही आज काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता आहे. 19 आणि 20 फेब्रुवारी रोजी देखील काही ठिकाणी सरींचा अंदाज आहे. अकोला, अमरावती, भंडारा, वाशिम, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा आणि यवतमाळमध्ये देखील तुरळक ठिकाणी पावसाच्या सरींचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
पुढील तीन दिवस किमान तापमानात कोणतेही बदल नाहीत. मात्र त्यानंतर विदर्भातील तापमान 2 ते 3 अंशाने घटणार आहे. मात्र, 25 फेब्रुवारीनंतर कोकणातील काही भाग वगळता कमाल तापमानात वाढ होणार आहे. महाराष्ट्रात सध्या सर्वत्र गारठा कमी झाला आहे. आधीपासूनच बदलते हवामान आणि अवकाळी, गारपीटीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांसमोर आता पुन्हा एकदा अवकाळीचं संकट उभं ठाकलं आहे.