पुणे – जिल्हा परिषद आणि पंचायत समितींसाठी गट-गण रचनेचे प्रारुप आराखडे तपासणीसाठी जिल्हा प्रशासनाकडून राज्य निवडणूक आयोगाकडे गुरुवारी सादर करण्यात आले. राज्य निवडणूक आयोगाने हे आराखड्याची प्राथमिक तपासणी, नकाशे, हद्दी यांची माहिती अधिकाऱ्यांकडून घेतली. सर्व आराखड्यांची तपासणीसाठी काही दिवस लागणार आहे. या तपासणीनंतरच गट-गण रचनेचे आराखड्यावर नागरिकांना हरकती-सूचना मागविण्यासाठी प्रसिद्ध केले जाणार आहे.
नवीन नियमानुसार पुणे जिल्हा परिषदेमधील सदस्यांची संख्या 7 ने वाढणार असून 82 तर पंचायत समित्यांमधील सदस्यांची संख्या 14 ने वाढणार असून 164 इतकी होणार आहे. जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमधील सदस्यांची संख्या वाढणार असल्याने अनेक इच्छुकांचे लक्ष या आराखड्यावर आहे. येत्या दोन-तीन महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहे. महापालिका निवडणुकीसाठी वॉर्ड रचना प्रसिद्ध करून त्यावर नागरिकांच्या हरकतीसुध्दा मागविण्यात आल्या आहे.
मात्र, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांबाबत रचनेच्या संदर्भात आयोगाकडून मागील आठवड्यात गट-गण रचनेचे आराखडे तयार करण्याचे काम सुरू करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला मिळाले. त्यानंतर तहसीलदार व प्रांताधिकारी यांनी हे आराखडे तयार करून जिल्हा प्रशासनाकडे सादर केले. गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयाने हे आराखडे राज्य निवडणूक आयोगाकडे सादर केले आहे.