भाऊसाहेब ठाकूर
राहू -दौंड तालुक्यात दोन गट व चार गण संख्या वाढल्यामुळे अनेकांच्या सुप्त इच्छा बाळावल्या आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत एक वेगळीच रंगत येणार आहे. दौंड तालुक्यातील थोरात-कुल गटांचा कडवा संघर्ष संपूर्ण जिल्ह्यात परिचित आहे. त्यामुळे वारंवार येणारी सोयरीकची प्रचिती सर्वसामान्यांना अनुभवयास मिळत आहे. त्यामुळे या दोन गटाला डावलून तिसरी आघाडीची शक्यता बळावली आहे.
दौंड तालुक्यात माजी आमदार रमेश थोरात आणि भाजपचे आमदार राहुल कुल यांचे प्रबळ गट गावागावांत आहे. या दोन गटातच खरी लढत होणार आहे. दोन्ही पक्षांकडे इच्छुक मोठ्या प्रमाणात आहेत. परंतु सर्वांनाच संधी मिळू शकत नाही. त्यातच दौंडमध्ये राष्ट्रवादी किंवा भाजपामध्ये अंतर्गत कुरघोड्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. त्यामुळे सवते सुभे जास्त प्रमाणात वाढले आहेत. दोन्ही पक्षांमध्ये मध्ये अनेक अशी जुनी व पक्ष पातळीवर वजन असलेली मंडळी आहेत. परंतु त्यांना अंतर्गत कुरघोडीमुळे वैयक्तिक जिल्हा परिषद, पंचायत समितीवर यश मिळू शकले नाही.
यावेळी निवडणुकीत राष्ट्रवादीने चांगली मशागत केली आहे. एक गट व दोन गण वाढले आहेत. परंतु त्यामुळे इच्छुक वाढले आहेत. मागील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत काही कार्यकर्त्यानी तिसऱ्या आघाडीचा प्रयोग केला होता. परंतु तो सपसेल फसला होता. आघाडीचा एकही सदस्य निवडून आला नाही. आघाडी करणारे सर्व नेते हे परत आपापल्या पक्षात स्थिरस्थावर झाले, ती एका पक्षांला कोठे तरी सोयीस्कर आघाडी होती, अशी कुजबुज लोकांमध्ये अनेक दिवस सुरू होती.
परंतु आता परिस्थिती वेगळी आहे. कारण दोन्ही पक्षांमध्ये अल्पसंतुष्टाची संख्या जास्त आहे. उमेदवारी डावलण्याची शक्यता जास्त असल्यामिळे अनेक वजनदार पुढाऱ्यांनी तिसरी आघाडी संदर्भात अंतर्गत नियोजन केल्याची चर्चा पूर्ण तालुक्यात आहे. त्यामुळे यावेळेस होणारी तिसरी आघाडी ही एखाद्या पक्षाशी सोयकरिक जुळविणारी आहे, अशी चर्चा जोर धरत आहे. ही तिसरी आघाडी एखाद्या पक्षाची सोय लावणारी ठरू शकते.
गट रचना होत असताना अनेक गटांची निर्मिती की ठरविकांना पोषक, काहींना प्रतिकुल करून होण्याची शक्यता आहे. तशी परिस्थिती देखील निर्माण झाली आहे. त्यामुळे नाराजांनी सर्वपक्षीय तिसऱ्या आघाडीच्या पर्याय निवडणार असल्याचे सांगितले जात आहे.
सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचे नियोजन, चर्चा
दौंड तालुक्यातील एका पक्षाच्या राजकीय पदाधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका या पक्षांच्या नावावर होऊ द्या किंवा थोरात-कुल गटांच्या नावाखाली होऊ द्या, काही ठराविक नेत्यांना डावलून पॅनल तयार केले की, तिसऱ्या आघाडीचा पर्याय तयार ठेवला आहे. यामध्ये सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचे नियोजन केले आहे. त्यांच्याशी चर्चा देखील झाली आहे. त्यामुळे दोन्ही पक्षातून डावललेल्यांना एक चांगली संधी मिळणार आहे.