कोलकता -पश्चिम बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांची भाजपमध्ये घुसमट होत आहे. त्यामुळे स्वगृही परतण्याची त्यांची इच्छा आहे, असा दावा बुधवारी तृणमूल कॉंग्रेसने केला. त्या दाव्याने बंगालमध्ये राजकीय सनसनाटी निर्माण झाली आहे.
अधिकारी यांना काही नेत्यांसमवेत तृणमूलमध्ये परतायचे आहे. तशी माहिती आमच्यापर्यंत पोहचली आहे. मात्र, आमचे दरवाजे त्यांच्यासाठी खुले होणार नाहीत. तृणमूलचे नेतृत्व करणाऱ्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याविषयी त्यांनी भाजपमध्ये दाखल झाल्यानंतर योग्य भाषा वापरली नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी आमचे दरवाजे बंद असतील, असे तृणमूलचे प्रवक्ते कुणाल घोष येथे पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
घोष यांच्या दाव्यावर प्रतिक्रिया देण्याचे अधिकारी यांनी टाळले. भ्रष्टाचार प्रकरणातील आरोपीच्या वक्तव्यावर मी काही बोलणार नाही, असे त्यांनी म्हटले. मात्र, घोष यांच्या दाव्यानंतर अधिकारी अस्वस्थ असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
बंगाल विधानसभा निवडणुकीआधी अधिकारी यांच्यासह अनेक नेत्यांनी तृणमूलला रामराम ठोकून भाजपची वाट धरली. त्या निवडणुकीत घवघवीत यश मिळवून तृणमूलने सलग तिसऱ्यांदा बंगालची सत्ता मिळवली. त्यानंतर भाजपमध्ये गेलेले अनेक नेते स्वगृही (तृणमूल) परतले आहेत.