मुंबई – देवेंद्र फडणवीस यांनी सरकार पाडण्याचा कितीही प्रयत्न केला तरी राज्यातलं सरकार आमच्या ताब्यात राहणारच आहे, परंतु केंद्रातील सरकारही आम्ही ताब्यात घेऊ, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिला आहे.
भाजपला महाविकास आघाडी सरकार पाडायचे आहे. तीनपैकी एक पक्ष त्यांच्यासोबत जाण्याची परिस्थिती त्यांना निर्माण करायची आहे. त्यासाठी आमच्या नेत्यांच्यामागे ईडीचा ससेमिरा लावला जात आहे. भाजपला वाटते की ते घाबरुन सरकारमधून बाहेर पडतील व सोबत येतील. पण हा भाजपचा गैरसमज आहे, असेही नवाब मलिक म्हणाले.
ईडीचा ससेमिरा पाठी लावण्यामागे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कटकारस्थान असून प्रत्येक नेत्यांच्यामागे ईडी कशी लावायची याचं मार्गदर्शन ते ईडी अधिकार्यांना करत असल्याने देवेंद्र फडणवीस यांना ईडीचा ओएसडी करुन टाका अशी मागणी केंद्र सरकारकडे नवाब मलिक यांनी केली आहे.
ईडीच्या माध्यमातून भीती निर्माण करुन सत्ता काबीज करता येणार नाही. हा महाराष्ट्र आहे. शरद पवार यांना नोटीस दिल्यानंतर तुमची काय परिस्थिती झाली होती हे राज्याने पाहिले होते. त्यामुळे तुम्ही जितका केंद्रीय यंत्रणांचा वापर करून सरकारला दाबण्याचा प्रयत्न करणार तितक्या ताकदीने महाराष्ट्राची जनता आमच्यासोबत राहील, असा विश्वासही नवाब मलिक यांनी व्यक्त केला.
ईडीचा अधिकारी राजेश्वर सिंग राजीनामा देतो आणि त्याला उत्तर प्रदेशमधून भाजप तिकीट देते याचा अर्थ ईडीचे अधिकारी भाजप कार्यकर्ते आहेत. सत्तेचा वापर करून हे करत आहात, परंतु सत्ता ही अमर नसते. सत्ता गेल्यानंतर विरोधक जर असं वागले तर तुमची काय परिस्थिती होईल हे भाजपला आणि अधिकार्यांना कळलं पाहिजे. त्यामुळे ईडीच्या अधिकार्यांनी कायद्याने काम करावे भाजप कार्यकर्ता म्हणून काम करु नये असा इशाराही नवाब मलिक यांनी दिला आहे.
महाविकास आघाडीचे सरकार 25 वर्ष टिकणार आहे. अधिकार्यांचा वापर करून बातम्या पेरायच्या. लोकांना बदनाम करायचे. नोटीसा पाठवायच्या हा सगळा उद्योग केंद्रीय यंत्रणांनी बंद करावा. हे जास्त दिवस चालणार नाही, असा स्पष्ट इशाराही नवाब मलिक यांनी दिला आहे. दरम्यान, सोशल मीडियाच्या माध्यमातून मलाही धमक्या दिल्या जात आहेत. मी काही भित्रा नाही. भाजपला कितीही काही करु द्या मी शेवटपर्यंत लढणार आहे अशी स्पष्ट भूमिकाही नवाब मलिक यांनी मांडली.