बिजनौर – उत्तर प्रदेशात नकली समाजवाद्यांनी राज्याचा विकास ठप्प केला असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. आज येथील सभेला व्हर्च्युली संबोधित करताना ते बोलत होते. ते म्हणाले की, राज्याच्या विकासाची नदी 2017 पूर्वीच रोखली गेली होती व त्याला हे नकली समाजवादी आणि त्यांची राजवटच जबाबदार होती.
या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्या सरकारने राज्याचा सर्वांगीण विकास साधत राज्य प्रगतीपथावर नेले, असा दावाही मोदींनी केला. गेली अनेक वर्षे येथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उसाची बिले दिली जात नव्हती, पण योगींच्या सरकारने आपल्या राजवटीत ऊस उत्पादकांचे दीड लाख कोटी रुपयांचे देणे अदा केले आहे. उत्तर प्रदेशातील गेल्या दोन सरकारांनी एकत्रितपणे जितके देणे दिले नव्हते त्यापेक्षाही आम्ही अधिकचे देणे शेतकऱ्यांना दिले आहे असा दावाही त्यांनी केला. आज बिजनौर येथे पंतप्रधान मोदींची त्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीतील पहिली सभा होणार होती. पण खराब हवामानामुळे ती रद्द करण्यात आली. त्याऐवजी त्यांनी ऑनलाइन सभेला संबोधित केले.