नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्पात भविष्यातील प्राधान्यांसह पुढील २५ वर्षांच्या आर्थिक विकासाच्या अपेक्षा मांडल्या आहेत. तसेच त्यांनी केंद्राचा अर्थसंकल्प सादर करताना अनेक महत्वपूर्ण घोषणांची माहिती देखील दिली. आज राष्ट्रपतींच्या अभिभाषण धन्यवाद प्रस्तावावर बोलताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारच्या संपूर्ण कारभाराचे वाभाडे काढल्याचे पाहायला मिळाले. राहुल गांधी यांनी आपल्या भाषणातून मोदी सरकारच्या त्रुटींवर बोट ठेवले.
राहुल गांधींनी मांडलेले मुद्दे
- सरकारने देशातील उद्योगांमध्ये एकाधिकारशाही तयार करुन केवळ दोन उद्योजक अदानी आणि अंबानी यांना श्रीमंत केल्याचा आरोप राहुल यांनी केला. ते म्हणाले देशातल्या 55 कोटी लोकांकडे जेवढी संपत्ती आहे, त्यापेक्षा अधिक संपत्ती अदानी आणि अंबानींकडे आहे.
- एका व्यक्तीला खनिजं, तेल, वीज आणि दुसऱ्या व्यक्तीकडे पेट्रोकेमिकल, ई-कॉमर्स, टेलिकॉम असे उद्योग देऊन टाकले. हे दोन उद्योगपती म्हणजे अदानी आणि अंबानी आहेत.
- बेरोजगारीवर बोलताना राहुल म्हणाले की, मागील एका वर्षात तीन कोटी युवकांचे रोजगार हिरावले गेले. मोदी सरकार रोजगार देण्याची गोष्ट करतय. पण वस्तुस्थिती वेगळी असून 50 वर्षातील सर्वाधिक बेरोजगारी सध्या देशात आहे.
- भारतातील युवक सरकारकडे रोजगार मागत आहेत. मात्र केंद्र सरकारने बेरोजगारांच्या मुद्द्यावर एकही शब्द काढला नाही.
- युपीए सरकारने दहा वर्षांच्या काळात 27 कोटी लोकांना दारिद्रय रेषेतून बाहेर काढलं, तर मोदी सरकारने 23 कोटी लोकांना पुन्हा दारिद्र्यात ढकलल्याचं राहुल यांनी म्हटलं.
- मागील सात वर्षांमध्ये असंघटित क्षेत्रातील आणि लघु उद्योगातील अनेक रोजगार बुडाले. त्यामुळे 84 टक्के भारतीयांच्या उत्पन्नावर परिणाम झाला, ते अधिक गरीब झाल्याचे राहुल यांनी नमूद केलं.
- केंद्र सरकारने नोटाबंदी आणि जीएसटीची अंमलबजावणी चुकीच्या पद्धतीने झाली, परिणामी देशाचं नुकसान झाल्याचा राहुल यांनी पुनरोच्चार केला.
- केंद्र सरकारच्या विविध धोरणांमुळे देशातील लघु उद्योगधंदे संपुष्टात येत असून असच सुरू राहिल्यास ‘मेड इन इंडिया’ उपक्रम पूर्ण होऊ शकत नाही, असंही गांधी म्हणाले
- आपण मोठ्या उद्योगधंद्यांच्या विरोधात नाही, पण देशात रोजगार वाढीचं काम छोटे, मध्यम उद्योगधंदे अधिक करतात असं महत्त्वाचं विधान राहुल गांधी यांनी केलं.
- देशात दोन भारत तयार करण्याचं काम मोदी सरकारने केलं आहे. एक भारत खूप श्रीमंत आहे, त्यांच्याकडे सत्ता आहे, त्यांना पाणी, वीजेच्या कमतरतेच्या समस्या येत नाही. तर दुसरा भारत गरीब पिचलेल्या लोकांचा भारत आहे. या दोन भारतामधील दरी वाढत असल्याचं गांधी म्हणाले.