बिबवेवाडी –केंद्र सरकारचा 2022-2023चा अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सादर केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने करोनाच्या पार्श्वभूमीवर सादर केलेला हा अर्थसंकल्प संजीवनी देणारा असून तो संकटात आलेल्या उद्योग-व्यवसायाला “बूस्टर डोस’, ठरेल अशी सकारात्मक प्रतिक्रिया पुणे शहरातील विविध क्षेत्रातील उद्योजक व व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे. अर्थसंकल्प पाहण्याची व्यवस्था “जीतो’ पुणेच्या कार्यालयात करण्यात आली होती. यावेळी जीतो ऍपेक्सचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विजय भंडारी, पुणे अध्यक्ष ओमप्रकाश रांका, जेएटीएफचे इंदर जैन, इंदर छाजेड, जीतो रेस्ट ऑफ़ महाराष्ट्रचे अजय मेहता, विशाल चोरडिया, जीतो लेडीज विंगच्या अध्यक्षा खुशाली चोरडिया, मुख्य सचिव लकिशा मर्लेचा, जीतो पुणे युथ विंगचे अध्यक्ष गौरव नहार, मुख्य सचिव प्रितेश मुनोत, किशोर ओसवाल, संदीप लुणावत, पुणेचे मुख्य सचिव पंकज कर्नावट, सचिव चेतन भंडारी आदी उपस्थित होते.
अर्थसंकल्पात पंतप्रधान निवास योजना आणि पायाभूत सुविधांसाठीची तरतूद विशेष उल्लेखनीय आहे. गुंतवणूक वाढवल्याने हा अर्थसंकल्प विकासाला बूस्टर डोस ठरेल. जीएसटी संकलन सर्वाधिक झाल्याने आनंद आहे. मात्र, सरकारने मागच्या काळातील व्यवस्थेमधील दोषामुळे निघत असलेल्या चुका मान्य करून व्यावसायिकांना दंड देणे थांबवावे. मेडिक्लेम योजना कामगारांबरोबरच उद्योजक व व्यावसायिकांना देखील लागू करावी. एकूणच हा अर्थसंकल्प सकारात्मक असून यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळेल.
– विजय भंडारी,
राष्ट्रीय उपाध्यक्ष, जीतो ऍपेक्स
जीतो पुणेच्या वतीने अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्र पाठविण्यात आले होते. यामध्ये आम्ही ज्या अपेक्षा व्यक्त केल्या त्याचा अंतर्भाव अर्थसंकल्पात दिसला. त्यामुळे अर्थसंकल्पातील निर्णयाबाबत समाधानी आहोत.
– ओमप्रकाश रांका,
अध्यक्ष, जीतो पुणे
करोना काळात गेल्या दोन वर्षांत भारत सरकारसमोर मोठी आव्हानं निर्माण झाली. त्या पार्श्वभूमीवर आज सादर झालेला अर्थसंकल्प चांगला आहे. आपली अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी हा अर्थसंकल्प मदत करणारा आहे.
– ऍड. एस. के. जैन,
प्रसिद्ध वकील
करोनामुळे झालेल्या नुकसानीनंतर उद्योग व व्यवसाय क्षेत्राची पुनर्बांधणी करण्यासाठी उपयुक्त असा हा अर्थसंकल्प आहे. प्रगतीचा आलेख उंचावण्यासाठी हा अर्थसंकल्प बूस्टर डोस ठरेल. यामुळं पॅकेजिंग क्षेत्रातील निर्यात नक्की वाढेल.
– मोहन भंडारी,
बिलकेअर
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आजच्या अर्थसंकल्पात सर्व गोष्टींचा अतिशय व्यवस्थित समतोल साधला आहे. पीएम गतिशक्ती योजना हा विषय गेम चेंजर ठरेल. सर्क्युलर इकॉनॉमीसाठी ही चांगली गोष्ट आहे. हे सरकार पायाभूत सुविधांवर अधिक भर देत असल्याचे आजच्या अर्थसंकल्पात पुन्हा एकदा दिसून आले.
– इंदर जैन, चेअरमन, जेएटीएफ
अर्थमंत्र्यांनी सादर केलेला अर्थसंकल्प “प्रोग्रेसिव्ह’ वाटतो. यामध्ये मोदी सरकार पायाभूत सुविधांवर अधिक भर देत असल्याचे स्पष्टपणे जाणवले. 80 लाख घर पंतप्रधान निवास योजनेतून बांधण्यात येणार आहेत. ही खूप चांगली गोष्ट आहे. तरीदेखील बजेटमधील सर्व तरतुदी समोर आल्यानंतरच आणखी बजेटचा अर्थ लागेल.
– शांतीलाल कटारिया, उपाध्यक्ष, क्रेडाई इंडिया
करोना काळात खूप खर्च झाला असल्याने कर वाढतील, असे वाटत होते. पण, तसे झालेले नाही. 2047 मध्ये अर्धी लोकसंख्या शहरात असेल, असा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे रिअल इस्टेट क्षेत्राला चांगले दिवस येतील. अर्थसंकल्प पाहता सरकारचं धोरण चांगले वाटले.
– मनोज छाजेड, संचालक, सिद्धी ग्रुप