मुंबई – केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पूत्र आणि भाजपा आमदार नितेश राणे यांना सिंधुदूर्ग बॅंक निवडणुकीच्या प्रचारात शिवसैनिकाच्या हत्येच्या प्रयत्नाचा गेल्या महिन्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिला. या प्रकरणातील सहआरोपी गोट्या सावंत याचाही अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आला. मात्र, अन्य एक आरोपी मनिष दळवीला अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला.
राणे यांच्या वकिलांनी या निर्णया विरोधात अपील करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी दोन आठवड्यांची मुदत लागेल. तोपर्यंत त्यांना अटकेपासून संरक्षण देण्याची मागणी केली. त्यानंतर न्यायालयाने राज्य सरकारने दिलेल्या तोंडी हमीची मुदत अखेरची संधी म्हणून 27 जानेवारीपर्यंत वाढवली. त्यानंतर आता नितेश राणे यांना सर्वोच्च न्यायालयात दिलासा मिळेल का? हे पाहणे महत्वाचे आहे.
दळवीला अटकपूर्व जामीन मंजूर करताना त्याने त्याचा पासपोर्ट जमा करावा आणि त्यांना पुढील आदेशापर्यंत सिंधुदूर्ग सोडता येणार नाही असे सांगितले. त्याच्याकडून 25 हजार रुपयांचा व्यक्तिगत जातमुचलका घेण्यात आला. 20 ते 22 जानेवारी पर्यंत तपासी अधिकाऱ्यांना भेटावे, असे आदेश दिले.
न्या. सी. व्ही. भडंग यांच्या एकसदस्यीय न्यायालयात 13 जानेवारीला झालेल्या सुनावणीचा निकाल राखून ठेवला होता. गेल्या वर्षी 18 डिसेंबरला रस्त्यावर झालेल्या राड्यात हा गुन्हा दाखल झाला. नंबरप्लेट नसलेल्या एका इनोव्हा मोटारीने 44 वर्षीय संतोष परब यांच्या मोटार सायकलला धडक दिली. त्यानंतर मोटारीतील व्यक्तींनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला चढवला.
सिंधुदूर्ग विशेष न्यायालयाने 30 डिसेंबरला अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर राजकीय वैमनस्यातून या प्रकरणात गुंतवल्याचा आरोप करत उच्च न्यायालयात 30 जानेवारीला आव्हान दिले होते.
नितेश यांच्या वकीलांनी युक्तीवाद केला की, आपल्या आशिलाला (नितेश) सिंधुदूर्ग बॅंकेच्या निवडणुकीपासून रोखण्यासाठी या गुन्ह्यात अडकवण्यात आले. विधान भवनाच्या बाहेर शिवसेनेच्या नेत्यांना पाहून 23 डिसेंबरला मांजराचा आवाज काढल्याच्या रागातून ही कारवाई केली आहे. त्यावेळी शिवसेना नेत्यांनी नितेश राणे यांना धडा शिकवण्याची भाषा केली होती.
पुण्यातून आणलेले भाडोत्री गुंड
विशेष सरकारी वकील सुदीप पसबोला यांनी गुरूवारी अटकपूर्व जामीन देण्यास विरोध केला होता. ते म्हणाले, नितेश हा या गुन्ह्याचा मास्टर माइंड आहे. तो साक्षिदारांवर प्रभाव टाकू शकतो. या हल्ल्यासाठी आणलेल्या भाडोत्री गुंडांना दिलेल्या पैशाची साखळीची कोठडीतील तपासात करायची आहे. नितेश राणे याने सचिन सातपुतेला आपल्या फोनवरून जाणीवपूर्वक फोन न करता त्यांचा स्वीय सहाय्यक राकेश परब यांच्या फोनवरून संपर्क साधला. नितेश राणे यांनी केलेला अशा स्वरूपाचा पहिलाच गुन्हा नाही. अशा स्वरूपाचे सहा गुन्हे त्यांच्यावर नोंद आहेत. भाडोत्री हल्लेखोरांना पुण्यातून सुपारी देऊन कणकवलीत आणले. अशा स्वरूपाची कार्यपध्दती त्यांनी यापुर्वीच्या प्रकरणात वापरली आहे.
राजकीय वैमनस्याचा नितेशच्या वकिलांनी केलेला दावा सरकार पक्षाने खोडून काढला. सचिन सातपुतेच्या अटकेनंतर या प्रकरणाचे धागेदोरे उलगडल्याने भाजपा आमदारांच्या अटकेची गरज निर्माण झाली. या हत्येच्या प्रकरणात नितेश यांना 21 डिसेंबरला समन्स बजावले. त्यांचा जबाब 24 डिसेंबरला नोंदवण्यात आला होता, याकडे विशेष सरकारी वकील पसबोला यांनी लक्ष वेधले.