नवी दिल्ली – चारचाकी वाहनांमधून प्रवास करणाऱ्यांची सुरक्षितता वाढवण्यासाठी आता आठ आसनी वाहनांमध्ये 6 एअरबॅग अनिवार्य असणार आहे, अशी घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज केली आहे. एअरबॅग अनिवार्य करण्याला मंजुरी मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
याबाबत नितीन गडकरी यांनी ट्वीट करत माहिती दिली. गडकरी म्हणाले, आठ आसनी चारचाकी वाहनांमध्ये प्रवास करणाऱ्यांची सुरक्षितता वाढवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. आता या चारचाकी वाहनांमध्ये किमान 6 एअरबॅग अनिवार्य करण्यात आल्या आहेत. हा मसुदा जीएसआर अधिसूचना मंजूर करण्यात आला आहे. यापूर्वी केंद्रीय वाहतूक मंत्रालयाने 1 जुलै 2019 पासून चालक एअरबॅग आणि 1 जानेवारी 2022पासून चालकासमोरील सह-प्रवासी एअरबॅगच्या फिटिंगची अंमलबजावणी अनिवार्य केली होती.
एखादा अपघात घडल्यास चारचाकी वाहनांमध्ये पुढील आणि मागील दोन्ही कंपार्टमेंटमध्ये बसलेल्या प्रवाशांना सर्वाधिक धोका असतो. हा धोका कमी करण्यासाठी एम-1 वाहन श्रेणी म्हणजेच आठ आसनी वाहनामध्ये 4 अतिरिक्त एअरबॅग अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
भारतातील वाहनांना पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित बनवण्यासाठी हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. एअरबॅग नियमांमुळे प्रवाशांची सुरक्षितता अधिक चांगली होईल, असेही गडकरी यांनी सांगितले.