मुंबई – राज्यात करोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत पुन्हा मोठी वाढ होताना दिसून येत आहे. राज्यात शुक्रवारी तब्बल 8 हजार 67 नवीन करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 1766 रुग्ण करोनामुक्त झाले आहे. मागील काही दिवसांपासून रुग्णसंख्या ही हजाराच्या पुढेच येत आहे. त्यातच नाताळ, वर्षाअखेर आणि नवीन वर्षानिमित्त होणाऱ्या गर्दीमुळे पुढील काही दिवसांमध्ये करोना रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
तसेच राज्यात आज चार ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झालेली आहे. आतापर्यंत 454 ओमायक्रॉनबाधितांची नोंद झाली असून त्यापैकी 157 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे. राज्यात आज आठ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून राज्याचा मृत्यूदर 2.11 टक्के झाला आहे. राज्यात सध्या 24 हजार 509 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
राज्यात आतापर्यंत 65 लाख 9 हजार 96 रुग्णांनी करोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.46 टक्के आहे. सध्या 1 लाख 75 हजार 592 व्यक्ती होम क्वॉरंटाईन, तर 1079 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.