मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतला मुंबई सत्र न्यायालयाने दणका देत तिचा अर्ज फेटाळून लावला आहे. लेखक आणि गीतकार जावेद अख्तर यांनी दाखल केलेल्या अब्रुनुकसानी प्रकरणाची सुनावणी घेणा-या न्यायालयावर आपला भरवसा नाही, असे स्पष्ट करत हे प्रकरणं दुस-या कोर्टापुढे वर्ग करण्यात यावी, अशी मागणी करणारा अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळून लावला आहे.
या अर्जावर अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. यु. बगाले यांच्यासमोर सुनावणी पार पडली. आपली बाजू न ऐकता बेकायदेशीरपणे या न्यायालयाने आपल्याविरोधात अटक वॉरंट जारी केला, असा आरोप कंगनाने या अर्जातून केला होता. अंधेरी दंडाधिकारी कोर्टाविरोधातील ही मागणी फेटाळून लावताना सत्र न्यायालयाने कंगनाविरोधातील कारवाई कायदेशीर ठरवली आहे.
याआधी मुंबई मुख्य महानगर दंडाधिकारी कोर्टानेही कंगनाचा याबाबतचा अर्ज फेटाळून लावला होता. त्याच निर्णयाला कंगनाने मुंबई सत्र न्यायालयात आव्हान दिले होते.