पुणे (गणेश आंग्रे) – खडकवासला धरणाच्या कालव्यांतून सोडले जाणाऱ्या पाण्याचे बाष्पीभवन, गळती, चोरी आदींमुळे सुमारे अडीच टीएमसी पाणी वाया जाते. शिवाय कचऱ्यामुळे कालव्यातील पाणी प्रदूषित होते. यावर खडकवासला धरण ते फुरसुंगी हा 25 किलोमीटर लांबीच्या बोगद्यामधून पाणी नेण्याची योजना आखण्यात आली आहे. त्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याच्या सूचना राज्य शासनाने दिल्या आहेत. यामुळे बचत होणारे पाणी शहर तसेच शेतीसाठी देणे शक्य होणार आहे.
या प्रकल्पासाठी सुमारे 1 हजार 500 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. खडकवासला ते फुरसुंगीदरम्यान कालव्यालगत सुमारे दोन हजार हेक्टर जागा आहे. त्याचा व्यावसायिक पद्धतीने वापर केल्यास त्यातून मोठा निधी उभा राहू शकतो. यातून बोगद्यासाठी येणारा खर्च करावा, असा विचार मध्यंतरी पुढे आला होता. त्यासाठी पीएमआरडीएने अहवाल करावा, असे जलसंपदा विभागाने कळवले होते. मात्र, पीएमआरडीएने त्यास नकार दिला होता. त्यामुळे आता खुद्द जलसंपदा विभागानेच हा प्रकल्प उभारण्याचे नियोजन केले आहे. हा “डीपीआर’ लवकर तयार करण्यासाठी निविदा मागविण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
प्रकल्प आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य
साधारणत: एक टीएमसी क्षमतेचे धरण उभारणीसाठी भूसंपादन आणि प्रत्यक्ष बांधकामासाठी सुमारे 1 हजार कोटींचा खर्च येतो. यानुसार अडीच टीएमसी क्षमतेचे धरण बांधण्यासाठी सुमारे 3 हजार कोटी रुपये लागू शकतात. मात्र, बोगद्यातून पाणी नेणे हा प्रकल्प आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य आहे, असा दावा जलसंपदा अधिकाऱ्यांनी केला आहे.
नवे धरण अशक्य
कृष्णा पाणी तंटा लवाद प्राधिकरणानुसार पुणे जिल्ह्यात नवे धरण बांधणे शक्य नाही. कारण आवश्यक असलेले पाणी यापूर्वीच अडवून त्यावर धरणे बांधण्यात आली. तसेच नवीन धरणासाठी नवीन जागेचा शोध घ्यावा लागेल. याचसह भूसंपादन आणि पुनर्वसन कठीणआहे. या पार्श्वभूमीवर बोगद्याद्वारे पाणी नेण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.