डेहराडून – माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशासाठी बंदुकीच्या 32 गोळ्या झेलल्या. मात्र, विजय दिवस साजरा करताना त्यांच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करण्यात आले, अशी खंत व्यक्त करत कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला.
भारताने 50 वर्षांपूर्वी पाकिस्तानला युद्धात पराभूत केले. भारताच्या त्या विजयामुळे स्वतंत्र बांगलादेशचा उदय झाला. तो दिवस (16 डिसेंबर) विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. ते युद्ध झाले त्यावेळी भारताच्या पंतप्रधानपदी इंदिरा होत्या. त्याचा संदर्भ घेऊन राहुल यांनी उत्तराखंडच्या डेहराडूनमधील कॉंग्रेसच्या सभेत बोलताना मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले. दिल्लीत विजय दिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सरकारी सोहळ्यात इंदिरा यांच्या नावाचा साधा उल्लेखही करण्यात आला नाही, असे ते म्हणाले.
माझ्या आजीवर (इंदिरा) गोळ्या झाडण्यात आल्याची माहिती मला शाळेत असताना देण्यात आली. उत्तराखंडमधील अनेक कुटूंबांना त्यांचे जीवलग देशाचे रक्षण करताना शहीद झाल्याचे दूरध्वनी येतात. अशाप्रकारचे बलिदान न देणाऱ्यांना त्या कुटूंबीयांच्या भावना समजणार नाहीत. माझ्या कुटूंबानेही बलिदान दिले आहे, असेही भावूक होत राहुल यांनी म्हटले.