वंदना बर्वे
नवी दिल्ली – शिवसेना नेते संजय राउत यांनी आज कॉग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेवून विरोधी पक्षांची राष्ट्रव्यापी आघाडी बनविण्यासाठी पुढाकार घेण्याची विनंती केली. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अलिकडेच ‘संयुक्त पुरोगामी आघाडी आता उरली कुठे आहे?’ असे विधान करून तेलाच्या उकळत्या कढईत पाणी शिंपडण्याचे काम केले होते, हे येथे उल्लेखनीय.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. या भेटीमुळे देशाच्या राजकारणात बऱ्याच चर्चा सुरू झाल्या होत्या.
अशातच, राज्यसभेतील शिवसेनेचे नेते संजय राउत यांनी आज कॉग्रेस नेते राहुल गांधी यांची निवासस्थानी भेट घेतली. यानंतर पत्रकारांशी बोलताना राउत म्हणाले की, ‘विरोधी पक्षांची देशव्यापी महाआघाडी बनविण्यासाठी राहुल गांधी यांनी पुढाकार घ्यायला पाहिजे’. राहुल गांधी आणि संजय राउत यांची ही भेट ममता बॅनर्जी यांच्या स्वप्नावर विरजण सोडण्यासारखे आहे, अशी चर्चा रंगली आहे.
राहुल गांधी यांच्यासोबतची भेट एक नियमित भेट होती. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये समन्वय साधण्यासाठी अशाप्रकारच्या भेटी घेतल्या जात असतात, असे सेनेने म्हटले आहे.
कॉग्रेसमधील सूत्रानुसार, विधानसभांच्या आगामी निवडणुकीत शिवसेना कॉग्रेसला पाठिंबा जाहीर करू शकते. परंतु, यूपी, पंजाब, उत्तराखंड या राज्यांमध्ये सेनेचे अस्तित्व नगण्य आहे.