नवी दिल्ली – अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील राज्यातील महाविकास आघाडी सरकार जोरदार हल्लाबोल केला. काही दिवसांपूर्वीच अमरावती जिल्ह्यात झालेल्या हिंसाचारावरून नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केलं.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून महाराष्ट्र राज्यात हिंसाचार वाढल्याचा दावा नवनीत राणा यांनी केला. तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या काळात हिंसाचार, दंगे होत नव्हते, अशी टीकाही राणा यांनी केली आहे. सध्या संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात त्या बोलत होत्या.
नवीत राणा यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं. फडणवीसांच्या काळात दंगे, हिंसा होत नव्हती. मात्र उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून हिंसाचार का वाढलाय ? असा सवाल राणा यांनी उपस्थित केला. तसेच राज्यात कायदा सुव्यवस्था आहे की नाही? असाही प्रश्न उपस्थित केला.
दरम्यान राज्यातील विविध भागांत झालेल्या हिंसाचारामागे कुणाचा हात आहे, याची चौकशी व्हावी, अशी मागणी यावेळी नवनीत राणा यांनी केली आहे.