अहमदाबाद – भारतातील नागरिकांना आत्यंतिक वेदना होत आहे. अर्थव्यवस्था आजही 2019 च्या पातळीच्या खाली आहे. आधीच कमी असणाऱ्या जनतेच्या आकांक्षा आणखी आक्रसलेल्या आहेत, असे मत नोबेल पुरस्कार विजेते अर्थतज्ज्ञ अभिजित बॅनर्जी यांनी व्यक्त केले. गुजरातमधील अहमदाबाद विद्यापीठाच्या ऑनलाईन सोहळ्यात अमेरिकेतून दूरदृकश्राव्य माध्यमाद्वारे बॅनर्जी सहभागी झाले. त्यावेळी त्यांनी हे आपले अभ्यासपूर्ण मत व्यक्त केले.
अलीकडेच बंगालमध्ये आले असता तेथील निरीक्षण नोंदवत हा अर्थतज्ज्ञ म्हणाला, तुम्ही (विद्यार्थी) अशा स्थानी आहात तुम्ही परिस्थिती पूर्वपदावर आणू शकता. समाजाला त्याची गरज आहे. भारतात आत्यंतिक वेदना असणाऱ्या काळात आपण सध्या आहोत.
मी अलिकडेच प. बंगालच्या ग्रामीण भागात वावरलो आणि त्या गोष्टी तुम्ही ऐकल्या असतील, तुम्हाला माहित असेल, लोकांच्या आकांक्षांचा चक्काचूर झाला आहे. आधीच अत्यंत किरकोळ असणाऱ्या आकांक्षा आणखी संकुचित झाल्या आहेत, असे बॅनर्जी म्हणाले.
भारताची अर्थव्यवस्था 2019 च्या तुलनेत आणखी कमी झाली आहे. ती नेमकी किती कमी याची मला कल्पना नाही, मात्र ती पुरेशी कमी आहे. आणि यासाठी मी कोणाल दोष देत नाही. मी फक्त हे सांगतोय, असे ते म्हणाले.
विद्यार्थ्यांनी त्यांच्या करियरचा मार्ग निवडताना समाज किंवा कुटुंबाच्या दबावाला बळी पडू नये. तर त्यांनी त्यांना जे व्हायचे आहे, तो मार्ग स्वीकारण्याचे धैर्य दाखवावे, असे ते म्हणाले. जवाहरलाल नेहरू विद्यापीठात शिकत असताना मी दहा दिवस तिहार कारागृहात काढले होते, याची आठवण त्यांनी यावेळी सांगितली.
ज्यावेळ मिी जेएनयू सोडून हार्वर्ड विद्यापीठात जाण्याच्या तयारीत होतो, त्यावेळी मी एका निदर्शनात भाग घेतला. मला दहा दिवस तिहार कारागृहात घालवावे लागले. “मी माझे करीयर बरबाद केले. हार्वर्ड किंवा अमेरिका तुला प्रवेश देणार नाहीत’ असे मी बाहेर आल्यावर मला अनेक ज्येष्ठांनी सांगितले. त्यांना मला याची खंत वाटावी असे वाटत होते, असे सांगून ते म्हणाले, सत्यजीत रे आणि श्याम बेनेगल हे अर्थशास्त्राचे विद्यार्थी होते. मात्र त्यांनी त्यांनी वेगळा मार्ग चोखाळला.