सांगली – रयत क्रांती संघटनेचे प्रमुख व आमदार सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब आता तरी जरा आपल्या महालातून बाहेर या आणि जनतेचे प्रश्न काय आहेत ते जाणून घ्या. कोरोना आला मास्क लावा आणि घरात बसा, आणि पळ काढा, याला वाघ म्हणत नाहीत. वाघ हा डरकाळ्या फोडत जात असतो आणि तुमच्यात वाघाचे एक ही लक्षण नाही. प्रत्येकवेळी बिळात जाऊन बसता.. आम्ही खरा वाघ बघायला अधिवेशनामध्ये येणार आहे,” अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली आहे. ते आटपाडी मध्ये बोलत होते.
खोत पुढे बोलताना म्हणाले, राज्यात शेतकरी, शेतमजूर आणि बाला बलुतेदार यांचे अनेक प्रश्न आहेत. त्यामुळे हे अधिवेशन पूर्ण झाले पाहिजे. मात्र हे सरकार अधिवेशन मधून सातत्याने पळ काढत आहे. देशाचे अधिवेशन महिनाभर चालते आणि यांचे पाच दिवस चालते. कारण यांना भीती वाटते यांचा भ्रष्टाचार बाहेर पडेल, अनेकांना मंत्री मंडळामधून बाहेर जावे लागेल. याच भीतीपोटी ते अधिवेशन घेत नाहीत, असा आरोपही खोत यांनी राज्य सरकारवर केला आहे.