नवी दिल्ली – देशाची राजधानी दिल्लीतील हवेच्या प्रदूषणाचा मुद्दा काही वर्षापासून चिंतेचा विषय होत आहे. आधी पंजाब-हरियाणातील शेतकरी या हंगामात तण जाळत असल्यामुळे हे प्रदूषण वाढल्याचा दावा केला गेला. मात्र, सातत्याने प्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. सरकार खूप प्रयत्न करत आहेत. मग तरीही प्रदूषण का वाढत आहे, असा सवाल करत सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली सरकार आणि केंद्र सरकारला फटकारले आहे.
दिल्लीतील हवेच्या प्रदूषणाबाबत उपाययोजना करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली सरकार आणि केंद्र सरकारला 24 तासांचा अल्टिमेटम दिला आहे. या काळात उपाय शोधला नाही, तर आम्ही पावले उचलू, असा दमच न्यायालयाने भरला आहे.
आम्हाला वाटतं की काहीही घडत नाही आणि प्रदूषण मात्र सातत्याने वाढतच आहे. फक्त वेळ वाया जात आहे, अशा शब्दांत सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी सरकारला फटकारले आहे. गेल्या चार आठवड्यांपासून दिल्लीतील हवेच्या प्रदूषणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असून अजूनही ठोस पावले उचलली जात नसल्याबद्दल न्यायालयाने तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.
प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याच्या दाव्यावर देखील न्यायालयाने ताशेरे ओढले. या समस्येवर सुनावणी सुरू झाली, तेव्हा हवेची एक विशिष्ट गुणवत्ता होती. जर तुम्ही इतके प्रयत्न केल्याचे सांगत आहात, तर मग प्रदूषण का वाढत आहे. कोणताही सामान्य माणूस हाच प्रश्न विचारेल. वकील अनेक दावे करत आहेत आणि सरकार खूप सारे प्रयत्न करत आहेत. मग तरीही प्रदूषण का वाढत आहे, असा सवाल न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड यांनी उपस्थित केला आहे.