पुणे – करोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर बूस्टर डोस घ्यावा का, याबाबत जगभरातच अनेक तर्कवितर्क मांडले आहेत. फायझर, मॉडर्ना, जॉन्सन आणि जगभरात अन्य दिल्या जाणाऱ्या लसींबाबत संशोधन होऊन बूस्टर डोसची मागणी होऊ लागली आहे, तर भारतात दिल्या जाणाऱ्या कोविशिल्ड, कोवॅक्सिन लसीचा बूस्टर डोस घ्यावा की नाही, याविषयी आपल्याकडे अनेक मतमतांतरे आहेत.
लसींचे डोस घेतल्यानंतर शरीरात निर्माण होणाऱ्या अँटिबॉडीज या केवळ सहा महिने टिकतात. त्यानंतर त्यांची क्षमता कमी होत जाते, असे बहुतांश संशोधनातून पुढे आले आहे. भारतात दि.16 जानेवारीपासून करोना प्रतिबंधक लस देण्याला सुरुवात झाली. त्यामुळे जागतिक संशोधनाचा विचार करता आणि लसींचा सहा महिन्यांचा प्रभाव लक्षात घेता, करोना उपचार या विषयावर गेल्या दोन वर्षांपासून काम करणाऱ्या काही तज्ज्ञांनी बूस्टर डोसविषयी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
लसीचे दोन डोस घेऊन करोना पॉझिटिव्ह होणाऱ्यांची संख्या भारतात कमी आहे. पण, जो अभ्यास झाला आहे तो फायझर, मॉडर्ना, जॉन्सन यांच्या लसींचाच झाला आहे. त्यामध्ये असे दिसले आहे की सहा महिन्यांनी प्रतिकारशक्ती 50 टक्क्यांपेक्षा खाली येते. आता समस्या अशी आहे, की भारतात कोविशील्ड आणि कोवॅक्सिन दिले आहे तर त्याचे “पब्लिकेशन’ अद्याप आले नाही. कोविशील्ड घेतल्यावर सहा महिने झाल्यानंतर किती टक्के प्रतिकारशक्ती राहते याचा अभ्यास अद्याप झालेला कुठे दिसत नाही. दुसरी बाब म्हणजे आपल्याकडे मेपासून मोठ्याप्रमाणावर लसीकरण सुरू झाले, म्हणजे 18 वर्षे वयापुढील नागरिकांनी दुसऱ्या लाटेनंतर लस घेण्याला सुरूवात केली. त्यामुळे नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीमध्ये खरे समजायला लागेल की, या डोसने मिळालेली प्रतिकारशक्ती सहा महिन्यांपेक्षा जास्त टिकेल का, आणि बूस्टर डोसची गरज आहे का? सर्वसामान्यपणे विचार केला तर अन्य लसींचे परिणाम सहा महिनेच दिसताहेत तर आपल्याकडे दिल्या जाणाऱ्या लसीचे काही वेगळे नसणार. त्यामुळे बूस्टर डोसच्या बाबतीत बोलायचे झाले तर अन्य देशांमध्ये तो द्यावा, असा विचार आहे तर आपल्याकडे का नाही?
– डॉ. धनंजय केळकर, विश्वस्त आणि वैद्यकीय संचालक, दीनानाथ मंगेशकर रुग्णालय
आपल्या देशात जानेवारीत लसीकरण सुरू झाले. पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस 28 फेब्रुवारीला दुसरा डोस घेतला. आता त्याला नऊ महिने पूर्ण झाले आहेत. जागतिक संशोधनात लक्षात आले, की सहा महिन्यांत अँटिबॉडीज कमी होत जातात आणि हळूहळू निष्क्रिय होतात. लोकांना करोना पुन्हा होऊ शकतो. आता जर पुन्हा लाट आली तर डॉक्टर्स आणि फंटलाइन वर्कर्स पुन्हा बाधित होऊ शकतात. त्यामुळे यांना तिसरा डोस द्यावा, असे म्हणणे आहे. अमेरिका, ब्रिटन, इस्रायल या देशांनी लसीचा तिसरा डोसही दिला आहे, ही सकारात्मक बाजू झाली. परंतु नकारात्मक बाजूही आहे. एकूण विचार केला तर आजपर्यंत अद्याप 30 टक्केलसीकरण झाले आहे. 70 टक्के लसीकरण अद्याप बाकी आहे. ज्यांचे राहिले आहे त्यांच्यामुळे साथ पसरू शकते. म्हणून त्यांचे लसीकरण पूर्ण होणे आवश्यक आहे. 2 ते 18 वर्षांच्या मुलांचे लसीकरण हेदेखील मोठे आव्हान आहे. त्यामुळे हे झाल्यानंतर जर आवश्यक वाटले तर भारत सरकार तिसऱ्या डोसचा विचार करेल. परंतु आता असा विचार करू नये, असे भारत सरकार आणि इंडियन मेडिकल असोसिएशनचे म्हणणे आहे. जागतिक आरोग्य संघटनेचाही तिसऱ्या डोसला विरोध आहे, कारण जगात अनेक देश असे आहेत की ज्यांना पहिला डोस घेणेही परवडत नाही. कारण ते गरीब आहेत. त्यांचे लसीकरण होणेही आवश्यक आहे. ते झाले नाही तर करोना आटोक्यातच येणार नाही, तो पसरत राहील.
– डॉ. अविनाश भोंडवे,
अध्यक्ष, “इंडियन मेडिकल असोसिएशन’ महाराष्ट्र
अद्याप संशोधनातून बूस्टर डोस देण्याबाबत काहीच सिद्ध झाले नाही. सरकार सांगेपर्यंत बूस्टर डोस देता येणार नाही. डोस शिल्लक आहेत म्हटल्यावर सरकार परवानगी देईल, असे वाटते. “आयसीएमआर’जे गाइडलाइन देईल, त्याप्रमाणे आपण काम करणार. दोन डोस घेऊनही करोना वेगाने होत आहे, त्यामुळे कोणीच अशा स्थितीत नाही की, बूस्टर घ्यावा की नाही हे सांगायला. त्याचा कितपत उपयोग होणारा आहे सांगता येत नाही. पण, बूस्टर घेऊन तोटा नाही असे शास्त्रज्ञ म्हणतात. “सीरम इन्स्टिट्यूट’चे अध्यक्ष सायरस पूनावाला यांनी आधीच सांगितले आहे की, बूस्टर डोस घ्यावा लागेल म्हणून. परंतु आता “पॉलिसी मेकर्स’ जे ठरवतील ते करावे लागेल.
– डॉ. बहार कुलकर्णी,
संजीवन रुग्णालय