मुंबई – केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना, ‘राज्यात मार्चमध्ये भाजप सत्ता स्थापन करेल’ असे भाकीत केले आहे. राणे यांनी यावेळी महाविकास आघाडी सरकारबाबत भाष्य करताना, ‘राज्यातील मविआ सरकार फार काळ टिकणार नाही.’ असा दावा देखील केला होता.
नारायण राणे यांच्या महाविकास आघाडी सरकारबाबतच्या वक्तव्यावरून आता शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे. शिवसेना नेते व मंत्री अनिल परब यांनी नारायण राणे काय म्हणतात याकडे लक्ष देण्याची गरज नाही असं म्हणत टोला लगावला.
काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राणेंच्या वक्तव्यावर नाव न घेता टिपणी करत, “भाजपा भविष्यवाणी करणारा पक्ष आहे. त्यांची भविष्यवाणी खोटी ठरू लागली आहे. त्यावर कुणाचाही विश्वास नाही. त्यामुळे त्यांच्या भविष्यवाणीला काही अर्थ राहिलेला नाही. राज्यातलं सरकार ५ वर्ष चालेल.” असा टोला लगावला.
नवाब मलिक यांचे ट्विट
अशातच आता राणे यांच्या वक्तव्यावर मंत्री नवाब मलिक यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. मलिक यांनी देखील राणे यांचे नाव न घेता आपल्या ट्विटर खात्यावर, “काही लोकांकडे २३ वर्षात नवसाच्या इतक्या कोंबड्या जमल्या की आता ‘त्या’ कोंबड्यांसाठी सरकार बनवण्याचं भाकीत करावंच लागतंय..” असं ट्विट केलं आहे. सोबतच मलिक यांनी #खंबीरसरकार #महाविकासआघाडीसरकार असे हॅशटॅग वापरत सरकार खंबीर असल्याचा संदेश दिला आहे.
काही लोकांकडे २३ वर्षात नवसाच्या इतक्या कोंबड्या जमल्या की आता ‘त्या’ कोंबड्यांसाठी सरकार बनवण्याचं भाकीत करावंच लागतंय..#खंबीरसरकार#महाविकासआघाडीसरकार
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) November 26, 2021
काय म्हणाले नारायण राणे?
माध्यमांशी संवाद साधताना राणे यांनी, “राज्यात अनागोंदी कारभार आहे. भाजपचं सरकार नाही त्यामुळे असं होत आहे. मार्चमध्ये भाजपचं सरकार येणार आहे. तेव्हा तुम्हाला अपेक्षित बदल दिसेल. राज्यातील मविआ सरकार फार काळ टिकणार नाही.”
“माझ्या मनात काही गोष्टी आहेत. त्या आताच सांगणार नाही. सरकार पाडायचं असेल किंवा नवं सरकार आणण्यासाठीच्या काही करायचं असेल तर अशा गोष्टी उघड बोलायच्या नसतात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आजारी आहेत. आजारी माणसाचं नाव घेऊन काही बोलणं योग्य नाही. पण आघाडी सरकारचं लाईफ अधिक नाही,” अशी वक्तव्य केली होती.