शहादा – राज्यात गेल्या 16 दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप चालू आहे. राज्य परिवहन महामंडळाचे शासनात विलिनीकरण या मुख्य मागणीसह अन्य् मागण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. मात्र यावर अद्याप कुठलाच तोडगा निघाला नाही. असे असताना एसटी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचे महामंडळाकडून सांगण्यात आले आहे. शिवाय अनेक एसटी कर्मचाऱ्यांना निलंबीत सुद्धा करण्यात आले आहे. असे जरी असले तरी एसटी कर्मचारी आपल्या मागणीवर ठाम आहेत.
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा निघत नसल्याकारणाने राज्यातील प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. त्यामुळे राज्यात काही ठिकाणी पोलिस संरक्षण देऊन एसटी रस्त्यावर आणल्या गेल्या आहेत. अशीच एक घटना नंदुरबारमधील शहादा येथून समोर आली आहे. एसटीला पोलिस संरक्षण देत पाच प्रवांशासह शहादा आगारातून धडगावसाठी बस सोडण्यात आली आहे. मात्र यावेळी एसटी बस चालकास धावत्या बसमध्ये हृदयविकाराचा त्रास झाला आहे. धाडगाव तालुक्यातील काकडदा या गावाजवळ अचानक चालकास हृदय विकाराचा त्रास होवू लागल्याने त्यांनी बस रस्त्याच्या कडेला उभी केली. बसमधील बसवाहक व प्रवाशांच्या हा प्रकार लक्षात येताच त्यांनी चालकास तात्काळ रुग्णालयात दाखल केले आहे. आता त्यांची प्रकृती स्थिर आहे.
अशोक कोळी असे या बस चालकाचे नाव असून शुक्रवारी सकाळी साडेअकराला शहादा बसस्थानकातून शहादा-धडगाव ही बस शहादा पोलिसांच्या संरक्षणात वाहक रवींद्र शिरसाट यांच्यासह पाच प्रवाशी घेऊन रवाना झाली होती. कोळी यांना वेळेत रुग्णालयात दाखल केल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.
दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांच्या संपादरम्यान या कर्मचाऱ्यांवर मोठा मानसिक ताण येत असल्याचे दिसून येत आहे. राज्यात गेल्या तीन ते चार दिवसात 4 एसटी कर्मचाऱ्यांचा हृदय विकाराचा झटका येऊन मृत्यू झाला आहे. यामध्ये निलंबणाच्या कारवाईमुळे या कर्मचाऱ्यांवर ताण आल्यामुळे हे घडले आहे. असा दावा करण्यात आला आहे.