मुंबई : दिल्लीच्या सीमेवर एक वर्षांपासून अधिक काळ केंद्र सरकारने केलेल्या तीन कृषी कायद्याच्या विरोधात शेतकरी आंदोलन करत होते. त्यांच्या या आंदोलनाला गुरुनानक जयंतीच्या मुहूर्तावर यश आले. मोदी सरकारने कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अभिनेत्री कंगना राणावतने पुन्हा एकदा सोशल मीडियावर नवी पोस्ट केली आहे. यात तिने संपूर्ण शीख समुदायाला खलिस्तानी म्हटल्याचा आरोप करण्यात आला आहे.
कंगनाने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये इंदिरा गांधी यांनी खलिस्तानी दहशतवाद्यांना आपल्या चपलीखाली डासांप्रमाणे चिरडल्याचं वक्तव्य केले आहे. यावरून नवा वाद निर्माण झाला आहे.
कंगनाने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीत म्हटले, “खलिस्तानी दहशतवादी आज शस्त्रास्त्रांच्या बळावर सरकारला प्रभावित करत असतील, पण एका महिलेला विसरायला नको. देशाच्या एकमेवर महिला पंतप्रधानाने त्यांना आपल्या चप्पलेखाली चिरडलं होतं. अशावेळी त्यांच्यामुळे या देशाला किती सहन करावं लागलं ते महत्त्वाचं नाही.”
“इंदिरा गांधींनी स्वतःच्या जीवाची किंमत देऊन यांना डासांप्रमाणे चिरडलं. त्यांनी देशाचे तुकडे होऊ दिले नाही. त्यांच्या मृत्यूनंतर अनेक दशकं झाली तरी त्यांच्या नावाने हे थरथर कापतात. त्यांना असाच गुरू पाहिजे,” असेही कंगनाने सांगितले.
कंगनाने तिच्या दुसऱ्या एका इंस्टा स्टोरीत इंदिरा गांधी यांचा फोटो शेअर करत त्याला कॅप्शन दिलं, “देशात खलिस्तानी चळवळ फोफावत असताना इंदिरा गांधी यांची गोष्ट याआधी पेक्षा अधिक कालसुसंगत होत आहे. … लवकरच तुमच्यासाठी आणीबाणी आणेल.”