नवी दिल्ली – या देशात केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी न घेताच कोणताही कायदा केला जातो किंवा कोणताही कायदा रद्द केला जातो. अशी पद्धत फक्त भाजपच्याच सत्तेच्या काळात सुरू झाली आहे, अशी टीका ज्येष्ठ कॉंग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी केली आहे.
मोदींनी काल तीन वादग्रस्त कृषी कायदे रद्द करण्याची घोषणाही केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मंजुरीविनाच केली आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही टीका केली आहे. चिदंबरम यांनी म्हटले आहे की, मोदींचा हा निर्णय म्हणजे त्यांच्या स्टेट्समनशिपचा उत्कृष्ट नमूना आहे, असे अमित शहांनी म्हटले आहे.
मोदींना शेतकऱ्यांविषयी अत्यंतिक कळवळा आहे असे जे.पी. नढ्ढा यांनी म्हटले आहे, शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन मोदींनी हा निर्णय घेतल्याचे संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी नमूद केले आहे. गेल्या 15 महिन्यांत हे नेते नेमके कोठे गेले होते, असा सवालही चिदंबरम यांनी उपस्थित केला आहे आणि मोदींनी ही घोषणा केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मंजुरीविनाच केली आहे हे आपल्या लक्षात आले आहे काय? असा सवालही चिदंबरम यांनी केला आहे.