नवी दिल्ली – पंतप्रधान मोदी यांनी देशाची माफी मागत तीन कृषी कायदे रद्द केल्याची घोषणा केली आहे. त्या पार्श्वभूमीवर आता चीनने भारतीय हद्दीत जे अतिक्रमण केले आहे त्याचीही कबुली पंतप्रधानांनी दिली पाहिजे, अशी मागणी कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली आहे.
ट्विटरवर त्यांनी ही प्रतिक्रिया नोंदवली आहे. चीनने भारतीय हद्दीत घुसखोरी करून दोन गावे वसवली असून अनेक ठिकाणी त्यांनी लष्करी अतिक्रमणही केले असल्याच्या बातम्या वेळावेळी प्रसारित झाल्या आहेत, पण मोदी सरकारने मात्र त्याचा सतत इन्कार केला आहे, किंवा त्या घटनांविषयी मौन बाळगले आहे.
राहुल गांधी आणि कॉंग्रेसने वेळोवेळी प्रसारित झालेल्या उपग्रह छायाचित्रांच्या दाखल्यासह चीनने भारतीय हद्दीत मोठे अतिक्रमण केल्याचे निदर्शनाला आणले आहे, पण सरकारकडून मात्र त्यावर काहीच भाष्य अद्याप करण्यात आलेले नाही. त्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी आज पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.