मुंबई – शीना बोरा हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने पुन्हा एकदा फेटाळून लावला आहे. साल 2017 पासून इंद्राणीने जामिनासाठी केलेला हा सहावा अर्ज होता. या याचिकेवर न्यायमूर्ती नितीन सांब्रे यांच्यासमोर सुनावणी पार पडली.
हा जामीन अर्ज कोणत्याही विशेष अथवा वैद्यकीय करणासाठी नसून निव्वळ गुणवत्तेच्या आधारावर करण्यात आला होता. यावरील सुनावणी पूर्ण झाल्यानंतर आपण याचिकाकर्त्यांच्या युक्तिवादाशी सहमत नसल्याचे सागंत ही याचिका फेटाळण्यापूर्वी ती मागे घेण्याची संधीही न्यायालयाने इंद्राणी मुखर्जी यांना दिली होती. या जामीन अर्जाला जोरदार विरोध केला होता.
50 वर्षीय इंद्राणी मुखर्जी गेली सहा वर्ष तुरूंगात आहे. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टात सुरू असलेल्या खटल्यात 253 पैकी केवळ 68 साक्षीदार आजवर तपासून झालेत. त्यामुळे हा खटला लवकर संपण्याची काहीही चिन्ह नाहीत.
अशा परिस्थितीत आणखीन किती काळ आरोपीला तुरूंगात ठेवणार?, असा सवाल या याचिकेतून उपस्थित करण्यात आला होता. याशिवाय इंद्राणीला कारागृहात विविध आजारांनी घेरले असून, तिला सतत मानसिक त्रास होत असल्याचे अहवालही यात नमूद केले होते.
इंद्राणीला जामीन दिल्यास साक्षीदारांवर दबाव आणला जाऊ शकतो, ज्याचा थेट परिणाम खटल्यावर होईल, म्हणून त्यांना जामीन देण्यात येऊ नये, अशी भूमिका तपासयंत्रणेकडून मांडण्यात आली.