मुंबई – गेल्या सात महिन्यात महाराष्ट्रातून केंद्र सरकारने इंधनावरील सेस द्वारे तब्बल 30 हजार कोटी रूपये वसुल केले आहेत अशी माहिती प्रदेश कॉंग्रेसच्यावतीने आज देण्यात आली. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली.
ते म्हणाले की केंद्राने 1 एप्रिल ते 31 ऑक्टोबर दरम्यान वसुल केलेला हा आकडा आहे. ते म्हणाले की केंद्र सरकारने जीएसटी नुकसान भरपाईचे महाराष्ट्राचे पैसे थकवून महाराष्ट्राला मोठा धक्का दिला आहे. त्यातच त्यांनी आज इंधनावर विविध प्रकाराचे सेस लाऊन महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात पैसे वसुली सुरू केली आहे.
देशाच्या विविध भागात झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये भाजपला झटका बसल्यानंतर त्यांनी इंधनावरील उत्पादन शुल्क कमी केले आहे. असाच मोठा झटका या सरकारला दिल्या शिवाय इंधनाच्या किंमती कमी होणार नाहीत असे ते म्हणाले.
महाराष्ट्र सरकारनेच आता इंधनावर वॅट कमी करून राज्यातील जनतेला काही प्रमाणात दिलासा दिला पाहिजे अशी मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे करणार आहोत असेही त्यांनी नमूद केले.